कागलच्या प्रकाश, सौ. सरोजिनी या नाईक दाम्पत्याचे शुभ मंगल: अनोख्या विवाहाची कहाणी
प्रतिनिधी / कागल
31 मे 1970 रोजीचा दिवस. सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांचा गोरज मुहूर्त. या शुभमुहूर्तावर सप्तपदी घेत ते बोहल्यावर चढले होते. त्यानंतर संसाराचा गाडा सुरू झाला. आयुष्यातील चढ-उतार, सुख-दुःख अनुभवत त्यांनी एकमेकाला साथ दिली. संसाराची गाडी पन्नास वर्षांची कधी झाली ते त्यांना कधी कळले नाही. पुन्हा 31 मे 2020 हा दिवस उजाडला. पन्नास वर्षांपूर्वीचाच प्रसंगाचा रिमेक असावा, असाच प्रसंग. पुन्हा ते दाम्पत्य बोहल्यावर चढले. विवाहसंस्काराचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले. अक्षता पडल्यानंतर त्यांच्या डोळय़ात अश्रू तराळले. पन्नास वर्षे कशी गेली ते कधीच उमजले नाही. आजूनही आपण एकत्र आहोत, त्याचा सार्थ अभिमान बाळगत त्यांनी पुढच्या पिढीच्या साक्षीने पुन्हा संसाराची गाडी सुरू केली.
एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा, अशी ही पटकथा आहे, कागल येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नाईक आणि त्यांच्या पत्नी सौ. सरोजिनी नाईक यांच्या संसाराची. पन्नास वर्षांपूर्वी विवाह झालेल्या नाईक दाम्पत्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांचा मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे यांनी ठरविले. पप्पा-मम्मीचे पुन्हा लग्न लावून द्यायचे. मुहूर्त निवडण्याची गरज नव्हती. कारण 31 मे 2020 या दिवसाचा मुहूर्त आपसूक तयार होता. लग्नाची तयारी सुरू झाली. पत्रिका काढण्यात आल्या. मेंहदीचा कार्यक्रम झाला. मुहुर्ताच्या सकाळी हळदीच्या कार्यक्रमात नाईक दाम्पत्य आपल्या आप्तस्वकीयात हळदी रंगून निघाले. सायंकाळी गोजर मुहूर्तावर चिरंजीव प्रकाश आणि चि. सौ. कां. सरोजिनी यांच्यावर मंगलाष्टकाच्या सुरावटीत अक्षता पडल्या. शुभ मंगल सावधान म्हणून नववधूवरांनी पुन्हा साताजन्माची शपथ घेत रेशिमगाठी बांधल्या. एक अनोखा विवाह संपन्न झाला. या विवाहात आनंद होता, आनंदाश्रू होते आणि होती संसाराचे शतक पूर्ण करण्याची उर्मी. प्रकाश नाईक यांचे वय 75 तर त्यांच्या पत्नी सौ. सरोजिनी यांचे वय 70 च्या आसपास. त्यांनी कागलचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. प्रकाश नाईक यांनी ‘तरुण भारत’च्या माध्यमातून पत्रकारिता करताना सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या मांडल्या. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, म्हणून शिक्षणसंस्था काढली. आज नाईक दाम्पत्य आपल्या सर्व परिवारांसह सुखी जीवन जगत आहे.
चार वर्षे डायलेसिस
या कथेतील नायक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नाईक गेली चार वर्षे डायलेसिसवर आहेत. पण त्यातून लढा देत त्यांची पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रातील कार्य सुरू आहे. या कथेची नायिका त्यांच्या पत्नी सौ. सरोजिनी यांच्यासह परिवारातील सदस्य त्यांची काळजी घेत आहेत.