जुन्या भेगा रुंदावण्यासह नव्या भेगांचे संकट
प्रतिनिधी/ लांजा
तालुक्यातील पन्हळे येथील 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या लघु धरणाला गत महिन्यात गळती सुरू झाली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचा विसर्ग केला. त्यांनतर पाटबंधारे कार्यकारी अधिकारी, अभियंत्यांनी धरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा केला. आता गळती थांबली असली तरी धरणाला भेगा पडत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आाहेत. त्यामुळे धरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी पन्हळे ग्रामस्थांच्यावतीने केली जात आहे.
पन्हळे धरणाची पाहणी करून पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी पडलेल्या भेगा निदर्शनास आणून दिल्या. पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असून धरणाच्या इतर भागातही नव्या भेगा पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. गत महिन्यात रात्रीच्यावेळी धरणाच्या खालील भागातून गढूळ पाण्याची गळती झाली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, शाखा अभियंता संजय नलावडे घटनास्थळी दाखल झाले. पाटबंधारे विभागाच्या तंत्रज्ञांनी येथे पाहणी केली होती. धरणात 3.44 द.घ.ल. मीटर पाणीसाठा होता. पाणी दाबामुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कार्यकारी अभियंता यांनी सांगितले होते की, या धरणाला गेली 5 वर्षे कमी प्रमाणात गळती आहे. मात्र त्याची दुरुस्ती होत असते. झालेली गळती ही धोक्याची नसून दुरुस्तीचा भाग असल्याचे सांगितले होते. या धरणाच्या डागडुजीसाठी 1 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले, मात्र काम केव्हा सुरू होणार, याकडे पन्हळेवासियांचे लक्ष लागले आहे.
धरणाच्या अन्य भागातही तडे
धरणाला पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असून धरणाच्या अन्य भागातही तडे गेले आहेत. धरणाला पडलेल्या भेगांमुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे. पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी धरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे.