कोरोना काळात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप : कारवाईतुन हजारो रुपयांचा दंड वसुल
प्रतिनिधी / पन्हाळा-
सध्या कोरोना महामारीमुळे कोल्हापुर जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत.कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु असुन यामध्ये पोलिसांचा वाटा महत्त्वाचा आहे. नुकतेच कोरोनातुन मुक्त झालेले पन्हाळा पोलिस निरीक्षक ए. डी. फडतरे यांनी विकेंड लॉकडाऊन असलेल्या शनिवार व रविवार या दिवशी बुधवारपेठ येथे वाहनांची तपासणी सुरु केल्याने पन्हाळ्याकडे विनाकारण येणाऱ्यांना चाप बसु लागला आहे. या कारवाईतुन हजारो रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
सध्या शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीच विकेंड लॉकडाउन असल्याने विनाकारण फिरता येत नाही.पण कोल्हापुरातुन सर्वात जवळचे पर्यटनस्थळ,निसर्गाचा ठेला लाभलेले,ऐतिहासिक ठिकाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य खिशाला परवडणारे हिल स्टेशन अशी पन्हाळगडाची ख्याती असल्याने उन्हाळा असो अगर पावसाळा येथे पर्यटकांची रीघ असते.त्यामुळे विकेंड लॉकडाऊन आणि पन्हाळा पर्यटकांसाठी बंद असुन देखील बंदी आदेश झुगारत पर्यटक पन्हाळ्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सदरच्या पर्यटकांना जकात नाक्यावरुन माघारी पाठवल्यास हे पर्यटक मसाई पठारकडे आपला मोर्चा वळत असतात.त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
मात्र पन्हाळा पोलिस निरीक्षक ए.डी.फडतरे यांनी स्वत:आपल्या फौजफाट्यासह शनिवार व रविवार या दिवशी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बुधवारपेठ व वाघबीळ येथे विनाकारण पन्हाळ्याकडे तसेच मसाई पठार कडे येणाऱ्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.गेल्या काही दिवसापासुन पोलिसांनी विनालायन्स वाहन चालविणाऱ्या,तिब्बलसिट प्रवास,तसेच विना मास्क फिरणे,विनाकारण फिरणाऱ्या शेकडो वाहनचालकांवर कारवाई करत हजारो रुपयांचा दंड वसुल केल्याने तसेच काही जणांना ताब्यात घेऊन कोर्टात पाठवल्याने परिसरातील स्थानिक नागरिकांच्यात समाधान पसरले आहे.
रविवार 20 जुन या एकाच दिवशी पोलिसांनी 22 हजारा रुपयांचा दंड वसुल करुन चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांच्या या कारवाईच्या दणक्यामुळे लाँकडाऊनच्या काळात विनाकारण,विनालायसन्स,नियमबाह्य वाहन चालविणाऱ्याना चाप बसला आहे.त्यामुळे पन्हाळ्याकडे येताय मग जरा जपुन ?असा संदेश पन्हाळा पोलिसांनी दिला आहे.