आरोग्यासह गळीत हंगामावर परिणाम
वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात पडत असलेल्या सततधार अवकाळी पावसाच्या फटक्याने नागरिक हैराण झाले असून सतत बदलत्या हवामानाने आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.सातत्याने सुरू असलेल्या पाऊसाने सुर धरलेल्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम जाणवू लागला असून कालच्या पाऊसाने ऊसतोड मजूरांच्या पालात पाणी शिरल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तालुक्यात गेली काही दिवस रोजच ढगाळ व दमट हवामानाने साथीचे रोग वाढू लागले आहेत ताप, सर्दी, खोकला अशा आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दत्त दालमिया व वारणा साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. पावसामुळे ऊस तोड खोळंबत आहे. तसेच तोडलेल्या ऊसाची वहाने शेतातून बाहेर काढणे कठीण होत असल्याने ऊस पुरवठ्यावर परिणाम जाणवू लागला आहे. काल रात्री व आज दिवसभर पडलेल्या सततधार पाऊसाने खळीत हंगाम काही दिवस खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज तर दिवसभर कारखाना कार्यक्षेत्रात ऊसतोडी बंद राहिल्या आहेत.
ऊसतोडी साठी गावागावात बाहेरून आलेल्या ऊस तोड मजूरांच्या पालात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्या मजूरांना ऐन पावसात निवारा शोधण्याची वेळ आली आहे.