प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा शहराचा पाणी समस्येचे ग्रहण काही सुटता सुटेनासे झाले आहे.कधी मोटारीत बिघाड,कधी पाईप लाईनला गळती तर कधी लाईट नाही,कधी मळी मिश्रीत पाणी यामुळे वारंवार पन्हाळ्याचा पाणीपुरवठा खंडित होत असतो.त्यातच गेली दहा-बारा वर्षापासुन एक दिवस आडाने व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पन्हाळकर त्रस्त झाले आहेत. शासनाने 2014 साली साडेपाच कोटी रुपये खर्चाची उत्रे येथील नवी नळपाणीपुरवठा मंजुर केली. पण योजनेचे काम आज-उद्या म्हणत पुढे सरकत आहे. अजुन ही योजना कधी सुरु होईल याची शाश्वती खुद्द नगरपरिषद देखील देत नाही. त्यामुळे पाणी सम्यसा जैसे थे आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र भितीचे सावट आहे. त्यातच वारंवार पाणीप्रश्नामुळे नागरिक हतबल झाले आहेत. या कारणाने एकीकडे कोरोना तर दुसरी कडे पाण्याची समस्या असे दुहेरी संकट पन्हाळावासियांच्यावर कोसळले आहे.
पन्हाळ्याचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे संकटात सापडला आहे. सध्या पन्हाळा शहराला आसुर्ले येथील जुन्या 1983 साली राबविण्यात आलेल्या पाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र ही योजना आता कालबाह्य झाली आहे.तसेच यामध्ये बिघाड हा नित्याचेच बनले आहे. त्यातच पन्हाळा शहराला एकदिवस आडाने व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे पन्हाळ्याचा पाणीप्रश्न लक्षात घेता शासनाने 2014 साली उत्रे येथील साडेपाच कोटी रुपयांची योजना मंजुर करुन आणली. मात्र त्य़ावेळच्या नगरपरिषदेच्या राजकीय परिस्थितीमुळे ही योजना रेंगाळली. त्यानंतर नगपरिषदेची 2017 मध्ये निवडणुक होवुन जनसुराज्य शक्ती पक्षाने सत्तेची हॅट्रीक केली. पण आज 2020 हे वर्षे परतीच्या मार्गाला लागुन देखील अद्याप नवी योजना कार्यन्वित करण्यात नगरपरिषद असफल ठरली आहे.
पन्हाळ्यातील महिलां वर्गाच्यावतीने वारंवार पाण्यासाठी निवेदने,रास्तारोको आंदोलने करण्यात येत आहेत. यावेळी पोकळ आश्वासने देवुन वेळ मारुन नेण्याची भुमिका नगरपरिषदेने घेतली. वास्तविक या नव्या पाणी योजनेची मुदत ही डिसेंबर 2018 पर्यंतच होती. पण ठेकेदाराच्या मनमानी कारभार व नगरपरिषदेच्या उदासिनतेमुळे जुन 2020 उजाडले तरी अद्याप काम पुर्ण होण्याची चिन्हे धुसरच आहेत.आॅक्टोंबर 2018 साली महिला वर्गाने रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी नगरपरिषदेने जानेवारी 2019 पर्यंत नवी योजना सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण आज आपण कोणत्या वर्षात आहोत याची जाग नगरपरिषदेला आलेली दिसत नाही. आता तर कोरोनाचे कारण नगरपरिषदेला तारणहार ठरला आहे.
आज संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट उभे आहे. त्यामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती विस्कटलेली आहे. पन्हाळ्यात सध्या पाण्याची फार मोठी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यात खाजगी टँकरचे दर भडकल्याने परिस्थिती असताना देखील विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था पन्हाळावासियांची झाली आहे. पन्हाळा वासियांची पाण्यासाठी होणारी फरफट लक्षात घेता नवी योजना सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे. पन्हाळा नगरपरिषदेवर एकहाती जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता असुन स्वत:पक्षाचे संस्थापक डॉ.विनय कोरे हे मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे आता त्यांनीच लक्ष घालुन नवी योजना सुरु करुन पन्हाळ्याच्या पाणी समस्याचे धगधगणारे विस्तवाची धग शांत करणे गरजचे बनले आहे.
दरम्यान, पन्हाळ्याच्या जुन्या योजनेत बिघाड होत आहे. तर या जुनी योजनेची एप्रिल महिन्यापासुन महाराष्ट्र जीवनप्राधिकरणे नगरपरिषदेकेडे जबाबदारी सोपवली आहे. अचानक घेतलेल्या प्राधिकरणाच्या भुमिकेने मोठी अडचण निर्माण झाली. सध्या नव्या योजनेचे काम पुर्णत्वास असुन येत्या 20-25 दिवसात नवी योजना सुरु होईल.नवी योजना सुरु झाल्यास पन्हाळ्याला चोवीस तास मुबलक पाणी पुरवठा होवुन पाणी प्रश्न कायमचा मिटेल.अशी माहिती मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी दिली.