भूसंपादीत जमिनीच्या मोबदल्याच्यावाटणी वरून वाद, चौघांना अटक
वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरुन सुरू झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाला आहे. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०, आवळी पैकी पोवारवाडी) असे मृत मामाचे नाव आहे. या प्रकरणी कोडोली पोलीसात रविवार दि. १३ मार्च रोजी रात्री ९.३० वा च्या सुमारास घडलेल्या गुन्ह्याची उशीरा फिर्याद जखमी भगवान महादेव पाटील रा.आवळी पैकी पोवारवाडी यानी नोंदवल्यावर पोलीसानी संशयित आरोपी प्रविण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील(तिघे, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) ता. पन्हाळा या चौघांना कोडोली पोलीसांनी अटक केली आहे. या खूनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, भगवान महादेव पाटील आणि संशयित आरोपी प्रविण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील हे एकाच गावातील असून एकमेकाच्या घरासमोर राहतात. यांच्यामध्ये गट नंबर ७४१ (अ) मधील कोल्हापूर –रत्नागिरी रोडसाठी भुसंपादित जमिनीला शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन गेले पंधरा दिवसापासून वाद सुरु होता. रविवारी(दि.१३) भगवान पाटील हे रात्री साडेनऊच्या सुमारास घराचे दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ करुन भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली.
हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडविण्यासाठी गेले असता सर्व संशयित आरोपींनी रघुनाथ पोवार यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये बसलेला मुलगा प्रतिक याला दगडाने मारहाण करुन दहशत माजवली. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पाटील ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक केली. आज सोमवारी दूपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.