प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोना संसर्गामुळे सर्वत्र बेकारी कुऱ्हा़ड कोसळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या पावसाळ्यात पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचल्याने गेली सात महिने तर आता मार्च महिन्यापासुन कोरोना संसर्गामुळे गडावरील पर्यटन व्यवसाय ठप्पच आहे. पन्हाळ्यात पर्यटन व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय असून त्यावरच स्थानिक नागरिकांचा उदरनिर्वाह होतो. सध्या पन्हाळ्यातील नागरिक हातावर हात धरुन गप्प बसलेले आहेत. त्यामुळे याची दखल घेत पन्हाळ्याचे उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले यांनी नगरपरिषद हद्दीतील स्थानिक हॉटेल व्यावसायिक व नागरिक यांच्या मिळकतीचा घरफाळासह अन्य सर्व कर माफ व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे शासनाने कडे केली. याबाबतचे निवेदन उपनविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे, नगराध्यक्षा रुपाली धडेल, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना भोसले यांच्यावतीने देण्यात आले आहे.
पन्हाळा हे ऐतिहासिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणुन नावाजलेले आहे. याठिकाणी पर्यटन व्यवसाय सोडलेस अन्य कोणताही व्यवसाय-उद्योग नाही. येथील बहुतांशी लोकांचा उदरनिर्वाह पर्यटन उद्येगावरच अवलंबुन आहे. गतवर्षी अतिव्रुष्टीने पन्हाळ्याचा एकमेव मुख्य रस्ता खचल्याने वाहतुक बंद झाली. यामुळे आपोआपच पर्यटन देखील बंद झाले. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम मार्च 2020 अखेरपर्यंत सुरु होते. त्यात कोरोना संसर्गामुळे भारताबरोबर पन्हाळा बंद ठेवला असून अद्याप बंदच आहे. त्यामुळे पन्हाळ्यावरील पर्यटन उद्योग बंदच झाले आहे. एकतर पर्यटन व्यवसाय बंद झाल्याने व अन्य काहीही काम नसलेने पन्हाळ्यावरील लोकांचे आर्थिकदुष्ट्या कंबरडे मोडले आहे. तसेच हॉटेल व पर्यटन व्यवसायासमोर मोठे संकट उभारले असुन रोजचे जीवन जगणे कठीण बनले आहे. तसेच हा व्यवसाय भविष्यात किती आर्थिक पाठबळ देईल याची शाश्वती नाही. तरी या गंभीर परिस्थितीचा विचार करुन पन्हाळ्यावरील स्थानिक नागरिकांच्या व हॉटेल व्यावसायिकांच्या मिळकतीवरील घरफाळा यांच्यासह छोटे स्टॉल धारक, दुकान गाळेधारक यांच्यासह अन्य सर्व कर 2019-20 व 2020-21 वर्षाकरीता पुर्णत: माफ व्हावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या मागणीमुळे शासनाकडुन योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी पन्हाळावासियांच्यातुन मागणी जोर धरत असुन घरफाळ्यासह इतर कर माफ होणार का..?याकडे लक्ष लागले आहे.