कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अथणी तालुक्यात सतर्कता
वार्ताहर / अथणी
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली तसेच मुंबई येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. लॉकडाऊननंतर राबविण्यात आलेल्या अनलॉक मोहिमेत पुणे, मुंबईहून मोठय़ा प्रमाणात नागरिक गावी परतले. मात्र येताना त्यांनी कोरोनाचा संसर्ग सोबत घेऊन आल्याने सप्टेंबर महिन्यात अथणी तालुक्याला मोठय़ा प्रमाणात याचा फटका बसला होता. हा अनुभव लक्षात घेत येणाऱया काळात पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तालुका प्रशासन सावध होत आहे.
पुणे-मुंबई आदी ठिकाणी पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत. अथणी तालुका हा महाराष्ट्राच्या नजीक असल्याने मोठय़ा संख्येने येथील नागरिकांचा महाराष्ट्रातील विविध शहरांशी तसेच गावांशी संपर्क असतो. शिवाय तालुक्यातील अनेक नागरिक नोकरी, कामानिमित्त महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कार्यरत आहेत. मात्र पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून ते आपल्या गावी परतण्याच्या तयारी आहेत. मात्र गतवेळेप्रमाणे पुन्हा अशा नागरिकांपासून तालुक्याला कोरोनाच्या संसर्गाचा विळखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील कोणी व्यक्ती तालुक्यात परतल्यास त्यांनी स्वतःहून आपली चाचणी करून घेऊन आपल्यासह परिवार व गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.
तालुक्यातील आरळहट्टी, पांडेगाव, शिरुर, खिळेगाव, अनंतपूर, मलाबाद, जंबगी, मदभावी, जकारहट्टी, बेवनूरसह अथणी शहर तसेच कागवाड तालुक्यातील विविध नागरिक मोठय़ा संख्येने नोकरी व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ते पुन्हा तालुक्यात परतत असतील तर त्यांची चाचणी घेऊन, अहवाल पाहून मगच त्यांना घरी घेणे जनतेच्यादृष्टीने हिताचे ठरणार आहे. यासाठी तालुका प्रशासनाने आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाची लाट अथणी तालुक्यात आल्यास ती आवरणे प्रशासनाला कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.