‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ या शब्दप्रयोगात फार मोठा आशय आहे. संघर्ष, त्याग, जीवावर उदार होऊन देशासाठी लढणाऱया वीरांची अखंड परंपरा आपल्या देशातील प्रत्येक खेडय़ात व शहरात आहे. त्या परंपरेचा मुकुटमणी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. पारतंत्र्यातून भारताची मुक्तता करण्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे म्हणून नेताजींचा उल्लेख करावा लागेल. म. गांधी यांनी नेताजींची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर या निधडय़ा छातीच्या वीराने स्वबळावर बलाढय़ अशा इंग्रजी साम्राज्यापुढे जबरदस्त आव्हान उभे केले. भारतातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध रान उठविले होतेच. ज्या सैन्याच्या बळावर ब्रिटिश राज्य करीत होते त्याच भारतीय सेनेमध्ये नेताजींनी स्वातंत्र्याचे बीज केव्हा पेरले याचा सुगावा ब्रिटिशांना लागला नाही. नेताजींनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचा पराभव जगावर साम्राज्य करणाऱया ब्रिटिश सत्तेकडून झाला असेल. परंतु, राजकारणाच्या लढाईत नेताजींनी ब्रिटिश सत्तेला सपशेल पराभूत केले. दुसऱया महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. त्याचे सर्व श्रेय सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या उदयाला द्यावे लागेल. नेताजींच्या चरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, अहिंसेचा जप करीत आणि आपली कातडी बचावत ब्रिटिशांना खूष करून स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न करणाऱया लोकांना नेताजींनी ठणकावून सांगितले, की ‘सशस्त्र क्रांतीखेरीज देश स्वतंत्र होणार नाही आणि त्यासाठी मी आझाद हिंद सेनेची स्थापना करीत आहे.’ नेताजींचे चरित्र म्हणजे एक महाकाव्य आहे. ते विस्मयकारक, विपरीत परिस्थितीत केलेली धडाडी, जाज्वल्य राष्ट्रप्रेमाने भरलेले आहे. काळय़ाकुट्ट आकाशात विद्युल्लता जशी अचानक प्रकट होते त्याप्रमाणे सुभाषचंद्र स्वातंत्र्याच्या रंगमंचावर चमकले. स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजींचे आराध्य दैवत. सावरकरांचा सल्ला मानून ते ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन 3 एप्रिल 1941 रोजी जर्मनीत केव्हा पोहोचले हे कुणालाच समजले नाही. ‘स्वातंत्र्य विनवण्या करून मिळत नसते. ते त्याग व लढा देऊन मिळवावे लागते’, हेच ते सारखे सांगत होते. जर्मनीत गेल्यानंतर सुभाषबाबूंनी प्रथम कोणती कृती केली असेल तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक पातळीवर आणला. त्यावेळी एकच प्रश्न विचारला जात होता, ‘नेताजी जर्मन देशातच का गेले?’ त्यामागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी नेताजींना सांगितले, की ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र!’ हे कौटिल्यप्रणीत तत्त्वज्ञान नेताजींना समजावून दिले व ब्रिटिशांचा बलाढय़ शत्रू असलेल्या जर्मनीला आपला मित्र मानून त्यांच्याशी संगनमत केले. 1941 साल म्हणजे जर्मनीचा विजयाचा परमोच्च काळ. केवळ 17 दिवसात जर्मनी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. इतकेच नव्हे तर युगोस्लाव्हिया पादाक्रांत करून इजिप्तकडे कूच केली. अशा या विजीगिषु जर्मनीचे साहाय्य घेऊन ब्रिटिशांना पराभूत करता येईल, हा सुभाषबाबूंचा कयास होता. सुभाषबाबूंचा बाल्यकाळ नजरेखालून घातला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सुभाषचंद्र लहानपणापासून त्याग, योग अशा साधनेत वाढलेले दिसून येतात. त्यांना हिमालयाचे आकर्षण होते. याचा उपयोग त्यांना मंडालेच्या तुरुंगात असताना झाला. त्या हालअपेष्टा भोगत असताना त्यांना लोकमान्य व गीतारहस्य आठवतात. एके ठिकाणी ते लिहितात, ‘लाल, बाल पाल यांच्या तुरुंगात शिक्षा भोगणे ही स्वातंत्र्यदेवीची पूजा आहे. मंडालेच्या घनदाट अंधारातील विजा म्हणजे कालीमातेच्या हास्यलहरी! तेथील वादळी निसर्ग कोणते तरी परमेश्वरी सौंदर्य आहे.’
हिंदुपतशाही निर्माते छत्रपती शिवाजी महाराज सुभाषबाबूंचे स्फूर्तिस्थान. 1937 साली विश्रांतीसाठी ते डलहौसीला होते. त्यांनी प्रख्यात बंगाली साहित्यिक विजयरत्न मुजुमदार यांना मुद्दाम बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी त्यांना विचारले, ‘शिवाजीराजांवर बंगालीत एकही पुस्तक नाही काय?’ मुजुमदार म्हणाले, ‘एक पुस्तक होते. परंतु, ब्रिटिशांनी ते जप्त केले आहे.’ सुभाषबाबू संतप्त झाले व म्हणाले, ‘बंगाली जनता, पत्रकार मग मूग गिळून का गप्प बसले आहेत? बंगाल शांत कसा? आणि म्हणाले, लवकरच असा दिवस येईल की हिंदी लोकांना आपल्या स्वातंत्र्ययुद्धात शिवाजीराजांचेच उदाहरण गिरवावे लागेल. परकीय सरकारला हाकलून लावण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्याच मार्गाने जावे लागेल! कितीही अडचणी येवोत शिवाजी महाराजांचे चरित्र प्रसिद्ध झालेच पाहिजे!’ शिवाजी महाराजांनी आग्य्राहून करून घेतलेली सुटका सुभाषबाबूंना प्रेरणा वाटायची. सुभाषबाबूंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा चांगलाच परिचय होता. सुभाषबाबूंच्या पुरोगामी गटाचे अधिवेशन जून 1940 मध्ये नागपूर येथे झाले. डॉ. हेडगेवार हे मध्य प्रांत काँग्रेसचे सदस्य म्हणून 1928 साली कलकत्ता काँग्रेस वार्षिक अधिवेशनाला गेले असता सुभाषबाबूंची व त्यांची भेट झाली होती व त्यावेळी देशाच्या तात्कालीन परिस्थितीबद्दल दोघात विचारविनिमय झाला होता. त्यांच्याबरोबर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव हेही होते. सुभाषबाबूंसारखा नि÷ावंत व कर्तबगार देशभक्त हिंदू-मुसलमान ऐक्मयाच्या भुलाऊ भोवऱयातून बाहेर पडू शकत नाही, याचे डॉ. हेडगेवार यांना सखेद आश्चर्य वाटे, असा उल्लेख ना. ह. पालकर लिखित ‘डॉ. हेडगेवार चरित्र’ पृ. 197 वर आहे. दि. 20 जून 1940 रोजी सुभाषबाबू हे डॉक्टरना भेटण्यास गेले होते. परंतु, त्यांच्या भेटीचा योग नव्हता. डॉक्टर मृत्युशय्येवर होते. सुभाषबाबूंना डॉक्टरांचे मार्गदर्शन हवे होते. परंतु, तो योग नव्हता. परंतु, कलकत्ता अधिवेशनात विचारविनिमय करताना डॉ. हेडगेवार व सुभाषबाबूंचे एकमत होते, ते म्हणजे परकियांपेक्षा स्वकियांशी (काँग्रेस पक्षांतर्गत) झगडण्यात अधिक शक्ती व वेळ खर्च होतो, त्याचे काही वाटत नाही, पण स्वातंत्र्यानंतर इतक्मया क्षुद्र वृत्तीच्या, सूडबुद्धीच्या, विधिनिषेधशून्य लोकांच्या हातात सत्ता गेल्यावर देशाचे काय होईल? हा प्रश्न सुभाषबाबूंनी डॉक्टरांच्यासमोर मांडला होता. स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत तो अनुभव देशवासियांनी घेतला आहे. आजही देश त्याचेच परिणाम भोगत आहे.
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल सुभाषबाबूंना अत्यंत आदर होता. भारतीय स्वातंत्र्याबद्दल त्यांनी आपले विचार त्यांना सांगितले. रवींद्रनाथ म्हणाले, ‘तुझ्या अपेक्षेमध्ये तथ्य आहे. हे मी मान्य करतो. म्हणून मला असे वाटते की पुढे आपण काय करावयाचे हे ठरवण्यापूर्वी तू गांधीजींना भेटावेस हे चांगले’. गांधीजींचा मुक्काम मुंबई येथे मरीन ड्राईव्हजवळील ‘मणिभवन’ येथे होता. भेटीच्यावेळी सुभाषबाबू पंचवीशीच्या उंबरठय़ावर तर गांधीजी पन्नाशी पार केलेले. सुभाषबाबूंनी गांधीजींना नमस्कार केला व म्हणाले, ‘मी सुभाषचंद्र बोस’. गांधीजी म्हणाले, ‘नाव ऐकले आहे. रूप पाहिले नव्हते. ब्रिटिशांना मतपरिवर्तनाच्या माध्यमातूनच हरवावे लागणार आहे.’ क्रांतीबद्दल ते साशंक होते, हे सुभाषबाबूंच्या लक्षात आले. ते म्हणाले, ‘राज्यकर्त्यांचे हृदयपरिवर्तन होईल ही कल्पना मला निव्वळ भाबडेपणा वाटतो.’ त्यांनी विचारलं, ‘पंचखंडावर आणि सात समुद्रावर स्वामित्व गाजविणारी साम्राज्यसत्ता केवळ मतपरिवर्तन व असहकाराचा प्रयत्न मानेल का, मला शंका वाटते.’ गांधीजींना विरोध सहन होत नसे. त्यांनी घडय़ाळाकडे पाहिले. आपल्याशी बोलण्याची त्यांची इच्छा नाही, हे त्यांना समजले. गांधीजी आत निघून गेले.
सुभाषबाबूंचा जन्म बंगभूमीच्या एका प्राचीन आणि प्रख्यात कुळात 23 जानेवारी 1897 रोजी झाला. 125 वर्षांचा काळ लोटला. नेताजींचे जीवन म्हणजे डोंगराएवढी संकटे व अडचणींचा मार्ग. त्यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यावर मात केली व युद्धाचे रणशिंग फुंकले ही अनन्यता व अलौकिक बाब आहे. अशा वीजुगिषु वीर पुरुषाला शतशः प्रणाम!
शारदाचरण कुलकर्णी