प्रतिनिधी/ पणजी
परतीच्या पावसाने राज्यातील जनजीवन अस्ताव्यस्त केले. तथापि शेजारील राज्यांच्या तुलनेत गोव्यात पावसाचे प्रमाण कमीच होते. पावसाळी ढग गोव्यापासून दूर उत्तरेच्या दिशेने महाराष्ट्रात गेले असल्याने गोव्यातील मुसळधार पावसाचे संकट आता दूर झालेले आहे. आज काही भागात किंचित सरी कोसळतील. उद्यापासून पाऊस काही दिवस तरी गायब होईल, असा अंदाज आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले व सायंकाळी विश्रांती घेतली. दिवसभर अंधारल्यासारखीच परिस्थिती होती. पणजीत सर्वांत कमी पावसाची नोंद झाली. मात्र वाळपई व सांखळी येथे दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी दोन इंच पाऊस झाला. पणजीत सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान जवळपास सव्वा इंच पाऊस झाला. यामुळे मान्सून संपुष्टात आल्यानंतर पडलेल्या पावसाची नोंद चार इंच झाली आहे.
चार राज्यांवरुन वादळ अरबी समुद्रात
हवामान खात्याने आगामी 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. परंतु कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू गोव्यापासून उत्तर दिशेला महाराष्ट्रात सरकला आहे. त्यामुळे त्याचे केंद्र सध्या मुंबई असून तो अरबी समुद्रात सकाळपर्यंत जाईल. अंदमान-निकोबारहून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे वादळात रुपातर झाले. त्यामुळे आंध्र पदेश तेलंगण, कर्नाटक एवढी राज्य पार करून हे कमी दाबाचे क्षेत्रवजा वादळ महाराष्ट्रात पोहोचले. महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र थैमान घातले व तेथून हे वादळ आता अरबी समुद्रात पोहोचले आहे. विक्षिप्त पद्धतीचे हे वादळ होते. मात्र त्याने या चारही राज्यांची अक्षरशः वाट लावली. अब्जावधी रुपयांची शेती वाया गेली. प्रचंड नुकसान झाले.
आज होणार सूर्यदर्शन
आजपासून गोव्यातील हवामानात सुधारणा होईल. कदाचित आज सूर्यदर्शनही होऊ शकते. किंचित काही भागात पावसाच्या सरी कोसळतील. उद्या 17 तारीखपासून मोकळे वातावरण राहील आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल, असा अंदाज आहे.
हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार फोंड येथे अर्धा इंच, पणजीत 1 सें. मी., जुने गोवे येथे पाऊण इंच, सांखळीत व वाळपईत प्रत्येकी दोन इंच, दाबोळी 1 सें. मी. व सांगे येथे 1 इंच पावसाची नोंद झाली.