तो निधी परत आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पंचायतकडे आलेले अनुदान परत गेले. यामुळे सदस्यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे सरकारकडे परत गेलेल्या अनुदानाबाबत चौकशी समिती नेमणार असल्याचे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी जिल्हा पंचायतमध्ये झालेल्या सर्वसाधरण बैठकीत सांगितले.
या बैठकीमध्ये याबाबत ठराव करुन तो निधी परत मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिह्यातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी सरकार निधी देतो. मात्र तो खर्च करण्याऐवजी अधिकारी सरकारकडे परत पाठवितात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कारण विकासासाठी निधी मिळावा यासाठी सरकारकडे धडपड करण्यात येते. मात्र बेळगाव जिल्हा पंचायतमधील अधिकाऱयांनी अशा प्रकारे निधी खर्च करता तो परत पाठविला याबद्दल जिल्हा पंचायत सदस्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
विकासासाठी आलेला निधी परत जातो ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यासाठीच समिती नेमणार आहे. तीन अधिकाऱयांचा यामध्ये समावेश असणार आहे. याबाबत संपूर्ण चौकशी करुन त्यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी सदस्यांना दिली आहे.
जिल्हा पंचायत सदस्यांनी विविध समस्यांबाबत आपले म्हणणे मांडले. त्याबाबत अधिकाऱयांकडून योग्य उत्तरे आलेली नाहीत. त्यामुळे अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारकडे परत गेलेल्या निधीवरुनच शुक्रवारची बैठक गाजली आहे. मात्र इतर प्रश्नांवर चर्चा झाली नाही. कोरोना बाबत जोरदार तक्रारी अनेक सदस्यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.