अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 29 डिसेंबर 2021, सकाळी 11.30
● जिल्ह्यात 527 परदेश प्रवाशींच्या चाचण्या
● महिन्यात 788 नागरिक ट्रेस
● सातारा, कराडला सर्वाधिक संख्या
● जिल्ह्यात गत 24 तासात बाधित
● 2845 संशयितांच्या चाचण्या
● तिसरी लाट येण्याची शक्यता कमी-डॉ.गोडसे
● सातारा येथे ‘कोविडायन डायरी ऑफ पेन्डॅमिक’ पुस्तकाचे प्रकाशन
सातारा / प्रतिनिधी :
राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच सातारा जिल्ह्यात कोरोना परिस्थती आटोक्यात ठेवण्यात प्रशासन अजुन तरी यशस्वी ठरले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 788 प्रवाशांना ट्रेस करण्यात आले आहे. त्यापैकी 527 नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या पुर्ण झाल्या असून फक्त 6 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील तीन रूग्ण बरे होऊन घरी सुद्धा गेले. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते. शिवाय अमेरिकेचे डॉ. रवि गोडसे यांच्या हस्ते आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार प्राप्त दिपक प्रभावळकर यांच्या अभ्यासपुर्ण लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या कोविडायन डायरी ऑफ पेन्डॅमिक या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. दरम्यान बुधवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी आलेल्या अहवालात नव्याने 21 रूग्ण आढळले आहेत.
तिसरी लाट येण्याची शक्यता कमी
मंगळवारी सातारा येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात अमेरिकास्थित डॉ. रवि गोडसे यांच्या हस्ते ‘कोविडायन डायरी ऑफ पेन्डॅमिक’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार प्राप्त दीपक प्रभावळकर यांच्या अभ्यासपुर्ण लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या या पुस्तकात कोरोनाच्या सुरूवातीपासून बदलत गेलेल्या परिस्थितीचा उल्लेख आहे. या पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना डॉ. रवि गोडसे यांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही असा दावा केला. तिसरी लाट का येणार नाही, याची सविस्तर व उदाहरणेही त्यांनी व्याख्यानात दिली. याचा सविस्तर वृत्तांत ‘तरूण भारत’ मधे उद्याच्या अंकात येईल.
सातारा तालुक्यात सर्वाधिक 229 आले
राज्यात ओमिक्रॉनचा वाढता प्रार्दुभाव पाहता रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट परदेशातून आलेल्या नागरिकांमधे आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांना ट्रेस करण्यावर भर दिला आहे. ट्रेसिंग केलेल्या 788 नागरिकांपैकी सर्वाधिक 229 नागरिक सातारा तालुक्यात आले आहेत. त्यापैकी 209 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून 208 निगेटिव्ह आहेत. कराड तालुक्यात 168 नागरिक परदेशातून आले आहेत. त्यापैकी 136 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून सर्व चाचण्या निगेटिव्ह आहेत.
परिस्थिती आटोक्यात तोपर्यंतच काळजी गरजेची
जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 788 नागरिकांचा पत्ता शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे मात्र 29 नागरिकांचा पत्ता अजुनही सापडलेला नाही. दरम्यान जिल्हा प्रशासन राज्यातील परिस्थितीमुळे पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळेच कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. आटोक्यात असलेल्या परिस्थितीतच जिल्हावासियांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आ हे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना वाढलेला बिनधास्तपणा नियंत्रणात आणण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मंगळवारी
नमुने-2845
बाधित-21
मृत्यू-2
मुक्त-57
उपचारार्थ-115
मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-23,62,580
बाधित-2,52,371
मृत्यू-6,497
मुक्त-2,44,945