कणकवलीत 38 कुटुंबे आली होती अडचणीत : तहसीलकडून आठवडाभर पुरेल एवढय़ा धान्याचा पुरवठा
कणकवली:
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असल्याने दैनंदिन मजुरीवर पोट भारणाऱया कणकवली-टेंबवाडी येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या, मूळच्या विजापूर येथील असणाऱया 38 कुटुंबांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, या सर्व निरक्षर कुटुंबांमधील एकमेव पदवीधर असलेली युवती जयश्री कट्टीमणी हिने पुढाकार घेत तहसीलदारांना अर्ज पाठवून सतत तीन दिवस पाठपुरावा केला. त्याची तहसील कार्यालयानेही दखल घेतल्याने कुटुंबांना आठवडाभर पुरेल एवढे धान्य तहसील कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहे.
मूळ विजापूरचे असणारे हे लमाणी समाज बांधव गेली 35 वर्षे कणकवलीत आहेत. टेंबवाडी येथे झोपडीवजा घरांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. दिवसभरात मिळेल, त्या मजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशातच ‘लॉकडाऊन’मुळे मजुरीही मिळणे बंद झाल्याने या कुटुंबांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ही बाब याच कुटुंबांपैकी एक असलेली जयश्री कट्टीमणी हिने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे नेते तथा समतादूत ऍड. सुदीप कांबळे यांना सांगितली.
त्यानुसार जयश्री हिने कणकवली तहसीलदारांना अर्ज पाठवून त्याद्वारे या सर्व कुटुंबांना अन्नधान्याची मदत व्हावी, अशी मागणी केली. पुढील तीन दिवस तिने कांबळे यांच्या साथीने सातत्याने पाठपुरावा केला. अखेरीस कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार यांनीही तातडीने लक्ष देत या सर्व कुटुंबांना धान्य पुरवठा केला. याबाबत या कुटुंबियांनीही तहसीलदारांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, जिल्हाभरात मजुरांची, भटक्या समाजातील अनेक कुटुंबे आहेत, ज्यांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. पण, या निरक्षर मंडळींना शासकीय मदत मिळवायची कशी, हेही माहीत नसल्याने संबंधित शासकीय यंत्रणेने गावागावात सर्व्हे करून अशा कुटुंबांना धान्य स्वरुपात मदत करावी, अशी मागणीही जयश्री हिने केली आहे.