एका बसमध्ये 23 ते 25 लोकांना बसविण्यात येणार
बेळगाव : / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय थांबले आहेत. अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल झाले. वाहतूक क्यवस्थाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे परराज्यांतील अनेक जण अडकून पडले आहेत. त्यांना आता त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. सेवा सिंधू ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करून ते गावी जाण्याची तयारी करत आहेत. अशा संकटात सापडलेल्या परराज्यांतील कामगारांना पोहोचविण्यासाठी परिवहन मंडळाने बसेस सज्ज ठेवल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे परराज्यांतील हजारो कामगार, नागरिक व विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी परिवहन मंडळाने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत राजस्थानमधीन कामगारांना परिवहनच्या बसने गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीने संबंधितांना पोहोचविण्याची सोय केली जात आहे.
नियम पाळूनच प्रवास करता येणार
परिवहन मंडळाने काही नियम केले असून ते पाळूनच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी याप्रमाणे बसण्याची व्यवस्था केली जात आहे. साधारणपणे एका बसमध्ये 23 ते 25 लोकांना बसविण्यात येणार आहे. एका राज्यातील 25 जणांचा ग्रुप तयार करून जाण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण वाहतूक क्यवस्था बंद ठेवण्यात आल्यामुळे काही जण पायी चालत प्रवास करत आहेत. अशा नागरिकांची सोय व्हावी, यासाठी परिवहन मंडळाने ही व्यवस्था केली आहे.