बेळगाव / प्रतिनिधी
क्लोजडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यांमध्ये परतु लागले आहेत. कामगार गावी परतु लागल्याने बांधकाम, उद्योग, हॉटेल तसेच व्यापार क्षेत्रातील चिंता वाढली आहे. मागील दोन दिवसांमध्ये बेळगाव रेल्वेस्थानकावर उत्तर भारतात जाणाऱया प्रवशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. सायंकाळच्या सुमारास निघणाऱया दादर एक्सप्रेस व ह. निजामुद्दीन या दोन रेल्वेने उत्तर भारतीय आपापल्या गावी परतु लागले आहेत.
बुधवारपासून राज्यात क्लोजडाऊन सुरू करण्यात आला. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच उद्योग, बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यास आली आहे. तरीही पुढील काळात लॉकडाऊन होईल या भितीने तसेच मागील वषीचा कटू अनुभव पाठिशी असल्याने जिल्हय़ातील कामगार आपल्या गावी परतू लागले आहेत. बेळगाव जिल्हय़ात औद्योगिक कारखाने, बांधकाम, हॉटेल, व्यापार यासारख्या व्यवसायात परप्रांतीय कामगार काम करत होते. कामगार गावी जावू लागल्याने या क्षेत्रातील चिंता वाढत आहे. कोरोना प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर कुशल कामगार कुठून मिळणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
रेल्वेने परप्रातीय गावी
सध्या बस बंद असल्याने परप्रांतीय मजूर रेल्वेने उत्तर भारतात जात आहेत. मागील दोन दिवसांपासून रेल्वेस्टेशन परिसरात मजूरांची गर्दी दिसत आहे. हुबळी- दादर, निजामुद्दीन एक्सप्रेसने हे मजूर गावी चालले आहेत. मुंबई तसेच दिल्ली येथून ते आपापल्या गावी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.