प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यात जाण्यासाठी कामगारांची धडपड सुरू आहे. सेवा सिंधू ऍपवर अनेक जण अर्ज करू लागले आहेत. मात्र त्या अर्जांना लवकर बेंगळूर येथून परवानगी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे हे परप्रांतीय कामगार चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी होत आहे.
देशातील विविध राज्यांतून कामानिमित्त बेळगाव जिल्हय़ात अनेक कामगार आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद झाली आहेत. गेल्या 46 दिवसांपासून कामे बंद राहिल्यामुळे हे परप्रांतीय कामगार आपल्या राज्याकडे परतण्यासाठी धडपड करुरू लागले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करून त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत आहेत.
कामगारांना अधिक माहिती नसल्यामुळे समस्या
काही कामगारांना अधिक माहिती नसल्यामुळे समस्या निर्माण होऊ लागली आहे. ऍपवर आम्ही अर्ज केला आहे. मात्र अजून आम्हाला कोणताच संदेश आला नाही म्हणून ते सांगत आहेत. या कामगारांची तळमळ पाहून साऱयांनाच दु:ख होत आहे. मात्र बेंगळूरवरून जाण्याबाबत परवानगी आल्यानंतरच कामगारांना सोडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोजच या कामगारांची गर्दी दिसू लागली आहे.