प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांची घुसमट अद्याप संपलेली नाही. गोव्यात काहीच काम-धंदा नाही तसेच घरमालक महिन्याच्या भाडय़ासाठी सतावत असल्याने परप्रांतीय कामगारांनी परतीची वाट धरली आहे. काल रेलगाडी नसल्याने पायी मध्येप्रदेश, बिहार कडे जाऊ पहाणाऱया कामगांराच्या मदतीला पोचले ते विरोधी पक्षनेते दिगंबर कामत.
काल मध्यप्रदेश किंवा बिहार कडे जाण्यासाठी श्रमिक ट्रेन नव्हती. त्यामुळे मडगाव रेल्वे स्थानकावर आलेल्या या कामगारांनी पायी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला व ते पायी चालत फोंडय़ाच्या बाजूने जात असताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आंबोरा-राय येथे जाऊन या कामगारांना रोखले व त्यांची विचारपूस केली.
गोव्यात गेल्या दोन महिन्यापासून काहीच काम नाही. त्यात हाती असलेला पैसाही संपत आला आहे. त्यात महिन्याचे खोलीचे भाडे थकल्याने घर मालक हाकलून लावत आहे. अशा वेळी इथे थांबून काहीच उपयोगाचे नाही. त्यात गोव्यात आत्ता कोरोना रूग्ण आढळून येत असल्याने, जीवाला धोकाही निर्माण झालेला आहे. तर दुसऱया बाजूने पाऊसही जवळ आलेला आहे. अशा वेळी आपल्या घरी जाणेच योग्य असल्याची माहिती या कामगारांनी विरोधी पक्षनेत्यांना दिली.
विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी नंतर राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडे संपर्क साधून त्यांना या परप्रांतीय कामगारांची व्यवस्था करण्याची मागणी केली. नंतर त्वरित फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक हे पोलीस फौजफाटय़ासहीत आंबोरा-राय येथे दाखल झाले. त्यानंतर कदंब महामंडळाच्या बसगाडय़ा पोचल्या. या बसगाडय़ातून त्यांना पेडे-म्हापसा येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.
उद्या सोमवार किंवा मंगळवारी या परप्रांतीय कामगारांना श्रमिक रेलगाडीतून त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन मुख्यसचिव परिमल राय यांनी विरोधीपक्षनेत्यांना दिले.