प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
वार्ताहर / दोडामार्ग:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत लॉकडाऊन करण्यात आले. याचा फटका सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱया परप्रांतिय मजुरांना बसला. मणेरी येथील वस्तीत प्रशासन पोहोचत नसल्याने भूकबळी होण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती याच वस्तीतून थेट शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व युवासेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांनी दिली.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना धुरी म्हणाले, मणेरी येथे परप्रांतीय कामगार धान्याच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दोन-तीन वेळा धान्यही दिले. त्या ठिकाणी 22 मजुर असून त्यांना वारंवार धान्य देणे शक्य होत नाही. पालकमंत्र्यांनी अशा वस्तींसाठी प्रशासनामार्फत धान्य पुरवठा व्हावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचले नसल्याचे मजुरांनी धुरी यांना सांगितले. त्यानंतर धुरी यांनी पत्रकारांसमोर या वस्तीची व्यथा मांडत प्रशासनाने धान्य पुरवठा करावा, अशी मागणी केली. या वस्तीत मजुरांसह छोटी-छोटी मुले आहेत. त्यांना अन्नधान्यांची नितांत आवश्यकता आहे एकंदरीत येथील परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढत गेल्यास भूकबळी होण्याची भीती धुरी यांनी व्यक्त केली.
आम्हाला गाव सोडायला परवानगी द्या!
यावेळी वस्तीतील महिला व्यथा माडंताना म्हणाल्या, आमचे रोजच्या मजुरीवर पोट आहे. पण, आता परिस्थिती भयानक होत चालली आहे. आमची दखल कोण घेत नाही. मुकादमही आमच्यातीलच असतात. त्यांची परिस्थिती ही आमच्यासारखीच असते. झोपडीत लहान मुले आहेत. या सर्वांचा विचार करून धान्य तरी द्यावे किंवा गावी तरी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.