प्रतिनिधी / साळवण
पाठीवर बिऱ्हाड बांधायच आणि बायकां मुलाबरोबर घर सोडून या राज्यातून त्या राज्यात स्थलांतर करणाऱ्या परप्रांतीय मजूरांवर कोरोनो विषाणू व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च पासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे हाताला कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण बाजारपेठ या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वास्तव्यास असणारा कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्हयातील मोलमजूरी करणारा ४० मजूरांचा तांडा असून या लॉकडाऊनच्या काळात या परप्रांतीय मजूरांना गेल्या दहा बारा दिवसापासून काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानूसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या परप्रांतीय मजूराचा सर्व्हे तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला व या परप्रांतीय मजूरांना आहे त्या ठिकाणाहून न हालण्याच्या सुचना करण्यात आल्या, त्यामुळे मुळात लॉकडाऊन मुळे मजूरी गेली आणि मिळकत नसल्यामुळे आहे ते अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपल्यामुळे या परप्रांतीय मजूरांची मोठी अडचण झाली आहे.
शासनाच्या आदेशानूसार प्रशासनाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा असणाऱ्या या परप्रांतीय मजूरांना तुम्ही ज्यांच्या माध्यमातून आला, त्यांच्याकडूनच मदत घ्या अशी सुचना करून स्थानिक प्रशासनाने हात वर केल्यामुळे मात्र मजूरी विना बेकार बनलेल्या आणि अन्न धान्याचा तुटवडा असणारा हा परप्रांतीय मजूरांचा तांडा कात्रीत सापडला आहे,एक तर लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने मजूरी नाही आणि मजूरी नसल्याने मिळकत नाही त्यामुळे अशा परिस्थिती आहे ते ठिकाण सोडून गावाकडे जायचे तर प्रशासनाने राहते ठिकाण न सोडण्याच्या सुचना केल्या असून या परप्रांतीय मजूरांची मोठी कोंडी झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी सहा सात महिन्याच्या काळासाठी मोलमजुरीसाठी निवडे साळवण या ठिकाणी तळ ठोकणाऱ्या या परप्रांतीय मजूरांकडे या आपत्तीच्या काळात प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उपासमारीच वेळ आली आहे, त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदी यामुळे अडचणीत सापडलेल्या परप्रांतीय मजूरांना शासनाने व समाजातील दानशुरांनी मदतीचा हात देऊन सहकार्य कारण्याची गरज आहे .