नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र सरकार ज्या चौकशा करत आहे, त्या महाराष्ट्र बाहेरील यंत्रणांनी कराव्यात अशी याचिका न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तुम्ही ३० वर्षे पोलीस दलात काम करत आहात आणि आता तुम्ही महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास राहिला नाही का? असा सवाल करत तुमची मागणी धक्कादायक असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंह यांना चांगलच सुनावलं आहे.
शुक्रवारी याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र पोलिसात काम करत आहात तरीपण तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. दाखल असलेल्या सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता, अशा शब्दात न्यायालयानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूनं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीनं युक्तिवाद केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांची चौकशी महाराष्ट्र सरकार करत आहे. ही चौकशी महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी करावी, अशी याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली.