मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. परमबीर सिंह यांच्या ५ निकटवर्तीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे परमबीर सिंह आणि ५ पोलीस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी ७ सदस्यीय एसआयटी स्थापित करण्यात आली आहे.
भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन येथे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपाससुद्धा याच एसआयटीकडून केला जाणार आहे.
दुसरीकडे, परमबीर सिंह यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.