ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्यानंतर परमबीर यांच्या जुहूमधील फ्लॅटच्या बाहेर ते फरार असल्याचा न्यायालयाचा आदेश चिटकवण्यात आला आहे. परमबीर सिंह यांना 30 दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे अल्टिमेटम देण्यात आले असून, ते वेळेवर हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
मुंबईमधील गोरेगाव येथील वसुली प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने परमबीर यांना अनेकदा समन्स बजावले होते, पण ते चौकशी आणि तपासासाठी हजर होत नव्हते. विनयसिंग आणि रियाझ भाटी यांनाही फरार घोषित करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात वसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार समन्स बजावल्यानंतरही परमबीर हजर होत नसताना गुन्हे शाखेने अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱयांच्या न्यायालयात त्यांना फरार घोषित करण्याचे आवाहन केले होते. न्यायालयाने अपील मंजूर केले. त्यानंतर मंगळवारी परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले.
दरम्यान, परमबीर सिंह यांना सोमवारी न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देत तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.