प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढल्याने राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शासनाकडून परवानगी घेतल्यानंतरच राज्यात येण्याची मुभा देण्यात येत आहे. आतापर्यंत विविध राज्यांमधून बेळगावमध्ये 1530 नागरिक आले आहेत. सध्या महाराष्ट्रातून आलेले 110 नागरिक अद्यापही सरकारी संस्थेत क्वारंटाईन आहेत. बंदी असूनही छुप्या मार्गाने येणाऱयांची संख्या वाढत आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महाराष्ट्रासह आणखी 5 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे परराज्यांतून येणाऱया नागरिकांना राज्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, सिंधू सेवा व आरोग्य सेतू ऍपद्वारे ई-पास घेऊन येणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने कर्नाटक शासनाने कडक उपाययोजना राबविल्या आहेत. तरीदेखील महिन्याभरात 1530 नागरिक परराज्यांतून बेळगावात दाखल झाले आहेत. छुप्या मार्गाने येणाऱयांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात आहे. महाराष्ट्रामधून येणाऱयांची संख्या जास्त आहे. 1530 पैकी हजारहून अधिक केवळ महाराष्ट्रातील आहेत. प्रवेश नाकारण्यात आल्यानंतरही महाराष्ट्रातून काही नागरिक आले आहे. त्यामुळे त्यांना सात दिवस सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहर व उपनगरांतील अद्याप 110 नागरिक सरकारी संस्थेत क्वारंटाईन आहेत. क्वारंटाईनमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्यासच स्वॅब तपासणी करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे.
व्यवसायानिमित्त एक किंवा दोन दिवसांकरिता शहरात येणाऱया नागरिकांना क्वारंटाईन राहण्याची आवश्यकता नाही. मात्र, आल्यानंतर माहिती देऊन नोंद करणे बंधनकारक आहे. व्यवसायानिमित्त आले असल्यास परत जाण्याचे तिकीट किंवा ज्या ठिकाणी आले आहेत त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. काम संपवून मूळ ठिकाणी गेल्यानंतर तेथील जीपीएस लोकेशन सरकारला पाठविणे आवश्यक आहे, असे विविध बदल करण्यात आले आहेत.