जागा उपलब्ध नसल्याने मिळेल त्याठिकाणी पार्किंग : वाहनधारकांना शिस्त कोण लावणार?
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पार्किग समस्येमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून पार्किंग व्यवस्थेअभावी परराज्यातील नागरिक कोणत्याही ठिकाणी वाहने पार्क करीत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाहनधारकांना शिस्त कोण लावणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
बाजारपेठेत पार्किंगची सुविधा नसल्याने पार्किंगची समस्या भेडसावत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहने पार्क करण्यात येत आहेत. बाजारपेठेतील काही रस्त्यावर ऑड-इव्हन तारखेला दुचाकी वाहने पार्क करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण सध्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असल्याने रहदारीस रस्ता अपुरा पडू लागला आहे. शहरात खरेदीकरिता गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून येणाऱया वाहनधारकांची संख्या मोठय़ाप्रमाणात आहे. पण पार्किंगकरिता शहरात महापालिकेने एकाच ठिकाणी वाहनपार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. तर काही ठिकाणी खासगी वाहनतळ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र पार्किंग तळाची माहिती परराज्यातील नागरिकांना माहिती नाही. तसेच बापट गल्ली येथील पार्किंग तळात वाहने पार्क करण्यासाठी गर्दी होत असते.
जर बापट गल्लीत पार्किंगकरीता जागा मिळाली नसल्याने बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
चारचाकी वाहनांची समस्या
शुक्रवारी दुपारी एक वाहनधारक तर चक्क संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरच्या मागील बाजूस वाहन पार्क करून निघून गेले. त्यामुळे रामदेव गल्लीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. वाहनांची गर्दी वाढल्याने थोडय़ावेळानंतर सदर वाहनधारकाने आपले वाहन येथून काढले. पण असे प्रकार बाजारपेठेत सातत्याने होत आहेत. सध्या नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, रामदेव गल्ली, कडोलकर गल्ली आणि रामलिंगखिंड गल्लीत चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. पण रस्त्याशेजारी, कॉर्नरवर वाहने पार्क करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने अन्य वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
बाजारपेठेतील रहदारी नियंत्रणासाठी विविध चौक आणि गर्दीच्या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात येत होती. पण अलिकडे केवळ मुख्य चौकात रहदारी पोलीस नियुक्त करून विनाहेल्मेट चालकांवर कारवाई करताना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात कोण आणणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तर बाजारपेठेत कोणत्याही ठिकाणी पार्क करण्यात येणाऱया वाहनांवर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.