वार्ताहर/ उचगाव
लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता संपत आला आहे. मात्र, परप्रांतातून गावाकडे येणाऱया चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील चौदा गावांपैकी अतिवाड व बेकिनकेरे या गावात क्वारंटाईनची संख्या सर्वाधिक असून स्थानिक नागरिक व नातेवाईक यांनी पूर्णतः सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रात 136 जण क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यापैकी चौघांना घरी पाठविण्यात आले आहे.
घरी परतण्यासाठी सेवासिंधू ऍपच्या माध्यमातून अर्ज केलेल्यांची आणखी नोंद आहे. मुंबई, पुणे, गोवा, रत्नागिरीहून येणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था ग्राम पंचायतींनी केली आहे. मात्र, अनेक शाळांमधून सुविधांचा अभाव असल्याने मूळ गावी परतलेल्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या क्वारंटाईन झालेल्यांची गावनिहाय संख्या अतिवाड 51, बेकिनकेरे 39, उचगाव 7, कोनेवाडी 4, तुरमुरी 8, सुळगा 9, मण्णूर 11 पैकी 4 जणांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. कुदेमनी 14, बाची 12, कल्लेहोळ व आंबेवाडी प्रत्येकी 1 याप्रमाणे आहे.
परराज्यातून येणाऱयाने स्वतःहून क्वारंटाईन व्हायला हवे. तसे न झाल्यास स्थानिकांनी माहिती दिली पाहिजे. याकरिता आरोग्य केंद्र, आशा-अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्याशी संपर्क साधणे हिताचे आहे. सर्वांच्या हितासाठी परराज्यातून आलेल्याने संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे. क्वारंटाईन होणे म्हणजे कोरोना झालाच, असा गैरसमज पसरविला जात आहे. क्वारंटाईन झाल्यामुळे सर्वांच्याच मनातील शंका दूर होताना सुरक्षितता प्राप्त होते. हे जाणून घेऊन प्रत्येकाने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.