परळी खोऱ्यात वळीवाची दमदार हजेरी: रस्त्यांवर मातीचे लोट: वाहधारकांची होतेय त्रेधातिरपीठ
अमर वांगडे / परळी :
परळी खोऱ्यात गेल्या आठवडाभरापासून वळीवाची हजेरी आहे. सोसाट्याचा वारा अन् गारांचा भडीमार
अशातच परळी ते केळवली रस्त्यावरील आलेले मातीचे लोट यामुळे मकरंद आनसपुरे यांचा मराठी चित्रपट ‘दे धक्का’ प्रमाणे वाहनधारकांना गाळात रुतलेले वाहन हे धक्का मारत बाहेर काढावे लागत आहे. संबंधीतांनी तत्काळ रस्त्यावरील गाळ काढून वाहनधारकांची होणारी त्रेधातिरपीठ थांबवावी, अशी मागणी वाहनधाकांमधून तसेच ग्रामस्थांकडून होत आहे.
सातारा जिल्ह्यात वळीव पाउस हा गेल्या आठवडयाभरापासून सातत्याने बरसत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परळी ते कातवडी हा रस्ता दुरुस्तीचे काम काही दिवसांपुर्वी पुर्ण झाले, मात्र, नाले खुदाई न केल्याने वळीवाने डोंगर उतारावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना धक्का मारत वाहने गाळामधून बाहेर काढावी लागत आहेत. परळी ते केळवली हा रस्ता प्रमुख रस्ता असून या मार्गाहून अनेक गावांना ये-जा करण्यास सोईस्कर ठरते. मात्र, वळीव पावसाने आलेले मातीचे लोट यामुळे हा मुख्य रस्ता आहे की गावातील अंतर्गत पांद रस्ता असा प्रश्नच उभा राहत आहे.
मान्सून आधी ग्रामीण भागातील नाले सफाई तसेच खुदाई ही सुरु झाली पाहिजे. मात्र संबंधीत प्रशासन डोळेझाक करत असल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गाडी गाळात बंद पडली तर तासंतास हे गाडी बाहेर काढण्यासाठी वेळ जात आहे. असे वाहनधारकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.