प्रतिनिधी / निपाणी :
निपाणी भाग साहित्य रसिक मंडळाच्यावतीने निपाणीत 18 व 19 जानेवारी रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र सदर संमेलनाच्या आवश्यक परवानगीसाठी स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकाऱयांकडे बोट दाखवले आहे. परिणामी सदर संमेलनाच्या परवानगीचा चेंडू जिल्हाधिकाऱयांच्या कोर्टात गेला आहे. मात्र साहित्य संमेलनासाठी आवश्यक तयारी मात्र जय्यत स्वरुपात झाली आहे.
निपाणीत खंडित झालेली साहित्य परंपरा जपण्यासाठी अनेक वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कनसेचा स्वयंघोषित म्होरक्या भीमाशंकर पाटील याने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मराठी भाषिकांतून संतापाची लाट उसळली. यानंतर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनास परवानगी देण्यासाठी प्रशासनाने जाचक अटी ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर निपाणीत शनिवारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या घरी संयोजकांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाची आवश्यक ती तयारी झाली असून महाराष्ट्र व कर्नाटकातील दिग्गज साहित्यिक संमेलनास उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलनात साहित्य विकासावर मंथन होणार आहे.
असे असताना संमेलनासाठी केवळ नगरपालिका व स्थानिक पोलिसांची परवानगी घेतली होती. यंदा मात्र जिल्हा प्रशासनाकडे परवानगी घ्यावी लागत आहे. स्थानिक प्रशासनाने केलेल्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱयांना सोमवारी भेटणार आहोत, असे सांगितले. यावेळी अशोककुमार असोदे, जयराम मिरजकर, गोपाळ नाईक, हरीष तारळे, विजय मेत्राणी, अजय माने, अस्लम शिकलगार, विठ्ठल वाघमोडे, अजय माने, संजय कांबळे आदी उपस्थित होते. प्रा. शरद कांबळे यांनी आभार मानले.