कमी वजनाची वाहतूक आंबडस-चिरणी पर्यायी मार्गाने वळवली
चिपळूण
हवामान खात्याने जिल्हय़ासाठी रेड ऍलर्ट जाहीर केल्याने अतिवृष्टीत दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 9 जुलैपर्यत बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण पवार यांनी बुधवारी दिले आहेत. तसेच कमी वजनाची वाहने कळबस्ते-आंबडस, चिरणी लोटेमार्गे पर्यायी मार्गाने वळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर परशुराम, येगांवसह राधानगर येथील दीडशे ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
जोरदार पावसामुळे परशुराम घाटात सोमवारी दरडी कोसळल्या. तसेच माथ्यावरील डोंगरालाही भेगा गेल्याने गेल्या 3 दिवसांपासून घाटातील वाहतूक बंद होती. मात्र 3 दिवस घाट बंदबाबत कोणतीच माहिती दिली न गेल्याने गेल्या शेकडो वाहने चिपळूण व लोटेकडे अडकून पडली. मंगळवारी सायंकाळी 24 तासांपासून अडकलेली वाहने सुरक्षितरित्या मार्गस्थ केल्यानंतर पुन्हा घाट बंद करण्यात आला. मात्र तरीही बुधवारी सकाळी काही वाहने सोडली गेली. प्रशासन घाट किती दिवस बंद ठेवणार, याबाबत कोणतीच माहिती दिली नसल्याने बुधवारीही शेकडो अवजड वाहनांची रांग दोन्ही बाजूला लागून राहिली. लोटेपासून थेट आवाशीपर्यंत तर पेढेपासून थेट कापसाळपर्यंत जागोजागी वाहने थांबवण्यात आली होती. प्रशासनाच्या या भूमिकेबाबत वाहनचालकांत संताप व्यक्त होत असतानाच सायंकाळी घाट बंदचा आदेश काढण्यात आला.
दरम्यान, महामार्ग विभागास ज्यावेळी परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी धोकादायक वाटेल, अशावेळी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार यापूर्वीच दिले गेले आहेत. सध्या सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेऊन 6 ते 9 जुलैपर्यंत घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, असा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी पवार यांनी घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 9 जुलै रोजीही घाटाची परिस्थिती पाहून व अतिवृष्टी यांचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तथापी बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही चिरणी-आंबडस पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
दरडग्रस्तांचे स्थलांतर
गेले 2 दिवस धुवाधार कोसळत असलेल्या पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला. बुधवारी सकाळी तालुक्यात सरासरी 165 मि मी. पावसाची नोंद झाली आहे. परशुराम येथील दुर्गवाडी व ब्राम्हणवाडी येथील 16, येगांव-डोगबांव व सुतारवाडी येथील 9, राधानगर येथील 9 कुटुंबांतील अशा एकूण दीडशेजणांना आपापले नातेवाईक, लगतच्या शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने पेढे, परशुराम येथे जाऊन तेथील ग्रामस्थान नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना केल्या.
घरे, गोठय़ांचे नुकसान
धुवाधार पावसामुळे तालुक्यातील कोळकोवाडी-मोरेवाडी येथील सुधीर पवार यांचे घर कोसळले असून त्याचे 65 हजाराचे नुकसान झाले. तसेच मांडकी शाळा नं.1 तर तिवरे येथील लक्ष्मण हिरवे यांच्या गुराच्या गोठय़ाचे अंशतः नुकसान झाले आहे. शहरातील विरेश्वर तलाव येथेही झाडाची मोठी फांदी कोसळली आहे. रहदारीच्या मार्गावरच फांदी कोसळल्याने हा मार्ग 3 दिवसांपासून बंद आहे.
कुंभार्ली घाटातील वाहतूक सुरळीत
मंगळवारी दरड कोसळून काहीसी विस्कळीत झालेली कुंभार्ली घाटातील वाहतूक रात्री पूर्ववत झाली. दरड तत्काळ बाजूला करण्यात आल्याने दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे.
एसटी फेऱयांचा मार्ग बदलला
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट बंद असल्याने मुंबईसह खेड मार्गावरील एसटी फेऱयांचा मार्ग बदलण्यात आला आहे. घाट सुरु होईपर्यंत मुंबई, खेडकडे जातेवळी एसटी फेऱया शेल्डीमार्गे तर मुंबई, खेडवरून चिपळूणला येताना चिरणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. यात सकाळी 6 वाजता चिपळूण-मुंबई व्हाया खेड, 8 वाजता चिपळूण-मुंबई, 10 वाजता चिपळूण कासे-बोरिवली, 11 वाजता चिपळूण-मुंबई, दुपारी 2 वा. चिपळूण-बोरीवली, सायंकाळी 6.30 वा. चिपळूण-ठाणे व्हाया खेड, 7 वा. चिपळूण-बोरीवली, रात्री 11 वाजता चिपळूण-मुंबई, सकाळी 8 वाजताची चिपळूण-दापोली तर मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात येणाया खेड मार्गावरील फेऱयांचा समावेश आहे.