राज्यभरात उसळली संतापाची लाट,दुरुस्ती करून सारवासारवीचे प्रयत्न : संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी पर्यटनमंत्र्यांच्या मागितला राजीनामा
प्रतिनिधी / पणजी
क्रूरकर्मा पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याची सुटका करण्यासाठी मदतीला धावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर व पराक्रमी मराठय़ा मावळ्यांना आक्रमणकर्ते संबोधण्याचा संतापजनक तेवढाच अक्षम्य अपराध गोवा पर्यटन खात्याने केल्याचे काल शुक्रवारी उघडकीस आले आहे. मात्र ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर खात्याने तडकाफडकी दुरुस्ती करून चुकीवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न केले असून त्याबद्दल माफीही मागितली आहे. या साऱया प्रकाराने शुक्रवारी दिवसभर राज्यभरात खात्याच्या काराभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षनेत्यांसह विविध राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱयांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेताना पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी व्टिटर हॅण्डल करणाऱयाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा चुका पुन्हा घडू नये यासाठी अधिकाऱयांना कडक समज देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गोवा पर्यटन खात्याने आग्वाद किल्ल्यासंबंधी पेलेल्या व्टिटमध्ये पोर्तुगिजांना डच आणि मराठे आक्रमणकर्त्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी 1612 मध्ये बांधण्यात आलेला हा किल्ला महत्वाचा ठरला, असा उल्लेख केला होता. परंतु ही चूक सजग माणसांनी लक्षात आणून दिल्यानंतर लगेच त्यांनी चुकीची दुरुस्ती करणारे नवे व्टिट केले आणि आक्रमणकर्ते हा उल्लेख केवळ डच यांच्यासाठीच होता, मराठय़ांसाठी नव्हे, अशी सारवासारव केली. मात्र या प्रकारामुळे पर्यटन खाते अडचणीत आले आहे.
जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी : कामत
या व्टिटवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिगंबर कामत यांनी भाजप सरकारने मराठा साम्राज्याचा अपमान करणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे गोमंतभूमीसाठी खूप मोठे योगदान आहे व गोवेकर ते कदापि विसरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भाजप सरकारने देशाचा गौरवशाली इतिहास बाजूला सारण्याचा प्रयत्न केला असून भाजपने आता तरी कार्यकर्त्यांना शिस्तीने व जबाबदारीने वागण्यास शिकवावे. गोव्याच्या वैभवशाली इतिहासाचा विपर्यास करू नये, असे सूचविताना कामत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या अशाप्रकारे झालेल्या अपमानास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हिंदूना बदनाम करण्याचे षडयंत्र : गोवा सुरक्षा मंच
अशाप्रकारे शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते म्हणणे हे पोर्तुगीजधार्जिण्या महाभागांचे षडयंत्र असून पर्यटन खात्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हिंदूना बदनाम करण्याचे कारस्थान आहे, असा आरोप गोवा सुरक्षा मंचने केला आहे. सदर प्रकाराची जबाबदारी घेऊन पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली आहे.
छत्रपती महाराजांबद्दल द्वेष का : दुर्गादास कामत
सदर व्टिटबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी, हिंदुंचे देव आणि दैवतांबद्दल या सरकारला द्वेष का? असा सवाल केला आहे. यापूर्वी या सरकारने बोडगेश्वर देवस्थान समितीवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर शिवजयंती दिवशी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, आणि आता शिवाजी महाराजांच्या शूर व पराक्रमी मावळ्यांना आक्रमणकर्ते म्हणण्याचे पाप केले आहे, असे कामत यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांबद्दल सरकारच्या या द्वेषाचे कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सरकारचा खरा चेहरा समोर : गिरीश चोडणकर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारकडून शिवाजी महाराज्यांच्या शूर मावळ्यांच्या झालेल्या अपमानाबद्दल कडक टीका केली आहे. यातून सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. भारतीय इतिहासाचा विपर्यास करणे हेच या सरकारचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.