प्रतिनिधी/ बेळगाव
शुभमंगल सावधान! ऐकताच वधु वर परस्परांच्या मस्तकावर अक्षता घालतात आणि आपल्या संसाराची स्वप्ने रंगविण्यास तेथूनच सुरुवात करतात. विवाहाने दोन कुटुंबे एकत्र येतात. मने जुळतात हळुहळु काळ पुढे सरकत जातो, तसे परस्परांची नीट ओळख होत जाते. आणि प्रितीचे बंध ही दृढ होऊ लागतात.
प्रसाद आणि अंकिता पवार या दोघांनी सुद्धा अशीच स्वप्ने पाहिली होती. अवघ्या तीन दिवसापुर्वी म्हणजेच 21 जानेवारी रोजी प्रसाद आणि अंकिता विवाहवेदीवर चढले. आप्तस्वकीय, मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला. प्रसादाच्या आई लक्ष्मी नलवडे या पोलीस उपनिरीक्षक असल्याने पोलीस दलातील असंख्य अधिकारी आणि कर्मचारी या विवाहास उपस्थित होते. लक्ष्मी नलवडे 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार होत्या. आपल्या मुलाच्या विवाहासाठीच त्यांनी रजा घेतली होती.
विवाहानंतर साधारणपणे कुलदैवतेला सौंदत्ती यल्लाम्मा किंवा जोतिबाच्या दर्शनाला जाण्याची अनेक घरांमध्ये प्रथा आहे. त्यानुसार लक्ष्मी नलवडे नवदाम्पत्यांसह सौंदत्तीला जाऊन परतत असताना दुर्दैवी अपघात घडला आणि या तिघांचाही मृत्यु झाला. त्याच बरोबरच अंकिताच्या आत्या दिपा शहापूरकर यांचा ही मृत्यु झाला. आणि क्षणार्धात त्यांची स्वप्ने ही मातीमोल झाली. अंकिताच्या कुटुंबियांच्या मनात कोणते विचार आले असतील याची कल्पनाही आपण करु शकणार नाही. मोठया कौतुकाने तिचा विवाह करुन देऊन साश्रु नयनांनी तिची पाठवणी करताना पालकांच्या एका डोळयात हासू आणि दुसऱया डोळयात आसू नक्कीच असतील. मुलीचा वियोग यामुळे आसु आणि तिचा संसारात प्रवेश झाला याचे हासू अशी त्यांची भावना निश्चित असणार परंतु अवघ्या दोन दिवसात तिचा कायमचा वियोग होऊन तिच्या आठवणीने डोळयातून अश्रूंच्या धारा लागतील असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल.
हा अपघात झाल्याचे वृत्त वाऱयासारखे शहरात पसरले आणि जो तो हळहळला. पोलीस दलाला धक्का बसलाच परंतु नवदाम्पत्यांचा ही अशा पद्धतीने मृत्यू व्हावा ही बाब सर्वांनाच चटका लावणारी ठरली. अपघाताच्या दृष्याचे फोटो ही व्हायरल झाले. आणि ते बघून अनेकांच्या अंगावर शहारे आले. अत्यंत हौसेनी भावाच्या लग्नात करवली म्हणून धावपळ करणाऱया लक्ष्मी यांच्या कन्या पुजा आणि पल्लवी यांची मनोवस्था सांत्वना पलीकडची आहे.
अलीकडच्या काळात रस्ते अपघातात असे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. दोष कोणाचा या चर्चेपेक्षा आता प्रत्येकानेच प्रामुख्याने प्रत्येक वाहनचालकाने आत्मपरीक्षण करण्याची निंतात गरज आहे. जाणारे निघून जातात, परंतु त्यांच्या मागे असणाऱया कुटुंबियांचे दुःख कोणत्याही शब्दांच्या पलीकडचे असते. त्यांच्या मनावरील हा घाव सहजी पुसला जात नाही. गेलेल्यांच्या आठवणी जपत आपले जीवन जगत राहणे ही त्यांच्यासाठी सत्वपरीक्षाच असते.
भरधाव वेगाने हाकली जाणारी वाहने ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आपण जरी नियमानुसार वाहन चालवले तरी समोरील व्यक्ती कसे वाहन चालवते हे आपल्या हातात नाही असे समर्थन केले जाते. मात्र प्रत्येकानेच वाहनाचा वेग किती असावा हे ठरवायला हवे. महामार्गांवर होणाऱया अपघातातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. सरकार सुद्धा त्याबाबत गंभीर झाले आहे. परिवहनच्या सर्व वाहक चालक यांना संयमाचे धडे द्यायला हवेत. तसेच त्यांचे संवेदनशीलकरण (सेन्सेटायझेशन) होण्यासाठी समुपदेशनाच्या कार्यशाळा आवश्यक आहेत. त्याचबरोबर सुसाट वेगाने वाहने चालविणाऱया तरुणाईला पालकांनी समज देण्याची आणि प्रशासनाने शिस्त लावण्याची तितकीच गरज आहे.
‘नजर हटी दुर्घटना घटी’, ‘वेग आवरा स्वतःला सावरा’, ‘वाट पाहतो लवकर या’ असे फलक महामार्गावर लावलेले आढळतात. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही त्यातील एक सूचना ही निश्चितच परिणाम करु शकते. प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय असतो हे लक्षात घेतल्यास दुसऱया कोणाच्याही मृत्युला आपण कारणीभूत ठरु नये हे प्रत्येक वाहनचालकाने आपल्या मनावर बिंबवले पाहिजे.
आता चौकशी, तपासणी, जबाब नोंदणी या सर्व प्रक्रिया सुरु होतील. तपासाअंती दोषी कोण हे स्पष्ट हेईल दोषींना शिक्षा द्या ही मागणी होईल मात्र अपघातामुळे विदीर्ण झालेल्या मनाचे घाव कोणत्याही रकमेने किंवा शब्दांनी भरुन येणार नाहीत. ‘पहिल्यास ठेच मागचा शहाणा’ यानुसार किमान या अपघाताची भीषणता लक्षात घेऊन प्रत्येक वाहनधारकाने खबरदारी घेतली तर अपघातांची संख्या निश्चितच कमी होईल.