पंतप्रधान मोदींचा सोनारपूर प्रचारसभेत हल्लाबोल – वाराणसीत ‘हर हर महादेव’ ऐकावे लागणार
वृत्तसंस्था / सोनारपूर
पश्चिम बंगालच्या हुगळीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी सोनारपूर येथे प्रचारसभा घेतली आहे. येथे त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या तृणमूल काँग्रेसच्या विधानावर बोचरी टिप्पणी केली आहे. ममतांनी जर वाराणसीतून निवडणूक लढविल्यास त्यांना टिळा लावलेले तसेच शेंडी असलेले अनेक लोक भेटतील. बंगालमध्ये जय श्री रामच्या नाऱयाने संतप्त होणाऱया ममतांना वाराणसीत हर-हर महादेव ऐकावे लागेल असे मोदी म्हणाले.
विधानसभा निवडणूक हरल्यावर लोकसभा निवडणुकीत ममतांनी अवश्य भवितव्य आजमावून पहावे. हल्दिया ते वाराणसीचा जलमार्ग केंद्र सरकारने विकसित केला असून त्याची ममतांना मदत होईल. तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अत्यंत मोठे मंथन सुरू असल्याचे कानावर आले आहे. ममतांनी नंदीग्रामध्ये जाण्याचा निर्णय घेत मोठी चूक केल्याचे तृणमूलमध्ये बोलले जात आहे. नंदीग्राममध्ये स्वतःचा पराभव ओळखत ममतांना दुसऱया मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय तृणमूलने घेतला होता. पण काही समजुतदार लोकांनी ही दुसरी मोठी चुक ठरणार असल्याचे ममतांसमोर स्पष्ट केल्यानेच हा विचार बाजूला पडल्याचे मोदींनी म्हटले आहे.
बंगालबाहेरील जागेचा शोध
ममता आता वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे तृणमूल काँग्रेस म्हणत आहे. यातून दोन बाबी स्पष्ट होता. एक तर ममतांनी बंगालमधील स्वतःचा पराभव स्वीकारला आहे. दुसरी बाब म्हणजे ममतांनी बंगालबाहेर स्वतःसाठी मतदारसंघ शोधण्याचे प्रयत्न चालविले आहेत. वाराणसीच्या लोकांवर, उत्तरप्रदेशच्या लोकांवर संताप व्यक्त करू नका ही एकच माझी ममतांना विनंती आहे. उत्तरप्रदेश-वाराणसीच्या लोकांनी मला अफाट प्रेम दिले आहे, ममतादीदींनाही त्यांचा स्नेह प्राप्त होईल असे मोदी म्हणाले.
टाका-मार-कंपनी
ममतादींनी बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवावा, जनतेने स्वतःचा निर्णय दिला आहे. ममतांना आता टाका-मार-कंपनी म्हणजेच तृणमूल काँग्रेससह ‘नबन्ना’ सोडून जावे लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोनारपूरपासून कोलकाता फार लांब नाही. येथील कष्टाळू मध्यमवर्ग दिवसभर कार्यालये आणि कारखात्यांमध्ये काम करतो, व्यापार करतो. पण तृणमूलचे खंडणीबाज त्याच्या कमाईतील एक भाग हिसकावून घेतात. तृणमूलचे खंडणीबाजार गरिबांच्या पोटावर लाथ मारण्यासह त्यांचे धान्यही लुटत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
ममता सरकार लक्ष्य
केंद्र सरकार महिलांच्या विरोधातील क्रूर गुन्हय़ांच्या जलद सुनावणीसाठी देशभरात एक हजारपेक्षा अधिक जलदगती न्यायालयांची स्थापना करत आहे. पण पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने या जलदगती न्यायालयांना मान्यता दिलेली नाही. मागील काही वर्षांमध्ये राज्यात निराशा पसरली असून त्याला आशेत बदलणे हेच ‘आशोल पॉरिबोर्तोन’ (खरं परिवर्तन) आहे. कट मनी, दलाल, भ्रष्टाचाराला रोखण्याचे एक अत्यंत सक्षम माध्यम आहे डिजिटल भारत. पण याचा तृणमूल काँग्रेसला मोठा त्रास होतो. ममतांच्या सरकारचे प्रगतीपुस्तक येथील रस्त्यांच्या स्थितीमुळेच स्पष्ट होते. राजधानी कोलकात्याला लागून असलेला भाग असूनही येथे वाहतूक कोंडी आणि पाणी तुंबण्याची समस्या नित्याचीच आहे. रस्ते पाण्याने भरून जातात, पण घरात स्वच्छ पेयजल मिळत नाही, कारण टँकर माफियांचीच मर्जी चालते अशी टीका मोदींनी केली आहे.