प्रतिनिधी / कोल्हापूर
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाडिकांचा पराभव होणार या भीतीपोटीच माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत योग्य ती कागदपत्रे उमेदवारी अर्जासोबत आम्ही जोडलेली आहेत. मैदानात लढण्यापेक्षा कायद्याची भाषा बोलून मैदानातून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. सतेज पाटील जिंकले तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे म्हणून महाडिकांनी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला.
पत्रकात म्हटले आहे, या निवडणुकीत, महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते माझ्या विजयासाठी झटत आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला प्रत्येक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे. याउलट, महाडिक पाठिंब्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जातात, त्या त्या ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. ज्या प्रमुख गटांच्या जीवावर ते निवडणूक लढवत होते, त्या गटांनी मला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, त्यांना नैराश्य आले आहे. माझ्या विजयाची महाडिकांनाच खात्री झाल्यानेच ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर महाडिकांनी आपला पराभव मान्य केला आहे. ज्यावेळी निवडणुकीत आपला पराभव दिसतो, त्यावेळी निवडणुकीतील मूळ मुद्दे बाजूला ठेऊन बाकीचे विषय उपस्थित केले जातात, आणि महाडिक तेच करत आहेत.
कोणत्याही निवडणुकीत समोरचा माणूस कोणती शस्त्र घेऊन लढाई करत आहे. हे पाहून त्या प्रकारची लढाई करायची असते. पण, महाडिक मात्र हे सगळं विसरून कागदपत्रे शोधण्यात वेळ घालवून रडीचा डाव खेळत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर महाडिक हे माझ्याविरुद्ध कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त होते. या उलट मी मात्र जिह्यातील भाजपसह सर्व पक्ष आणि स्थानिक आघाड्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या. या निवडणुकीत हे मतदारच महत्वाचे आहेत. महाडिकांची अशा प्रकारची कागदपत्रे या निवडणुकीत कामाला येणार नाहीत. आपल्याकडे विजयाएवढी मते आहेत असे दावे सतत करणाऱया महाडिकांनी आपल्या पत्रकार परिषदेत माझ्या विजयाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे.
भाजपच्या बैठकीवेळी, आमदार प्रकाश आवाडे यांनी राहुल आवाडे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती, असा विषय उपस्थित करताच माजी आमदार महाडिक यांनी आम्ही माघार घेतो, तुम्ही निवडणूक लढवा, असे म्हणत हात जोडले होते. हे पाहता, निवडणूक लढविण्यापूर्वी मानसिकरीत्या महाडिकांनी पराभव मान्य केला आहे. असे ही सतेज पाटील यांनी म्हटले आहे.