बेळगाव \ प्रतिनिधी
कोरोनामुळे दोन महिन्यांहून अधिककाळ बंद असलेल्या बससेवेला मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून सुरुवात झाली. बससेवा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप प्रवाशांची संख्या रोडावलेलीच पहायला मिळत आहे. बसस्थानकात लांब पल्ल्यासह सर्व बसेस थांबून असतात. तरीदेखील प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच आहे. त्यामुळे परिवहनला तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याने परिवहनच्या चाकांना गती कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बससेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांचा प्रतिसाद थंडावलेलाच आहे. त्यामुळे बेळगाव विभागाला रोज 70 लाखाचा फटका बसत आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून रोज 300 ते 400 बसेस धावत असल्या तरी प्रवाशांची संख्या तुरळक प्रमाणात आहे. परिणामी तोटा सहन करावा लागत असला तरी बससेवा मात्र सुरूच आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बससेवेला दि. 17 मे पासून सुरुवात झाली. परिवहनच्या स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या बसेसमधून मोजकेच प्रवासी प्रवास करत आहेत. तर अनेक बसेस रिकाम्याच फिरताना दिसत आहेत. त्यामुळे परिवहनचा महसूल पूर्णपणे थांबला आहे. याचा परिणाम कर्मचाऱयांच्या वेतनावरदेखील झालेला दिसून येत आहे. सध्या आगारातून शहरासह, ग्रामीण व लांब पल्ल्याच्या बसेस धावत असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद मात्र थंडावलेलाच पहायला मिळत आहे.
परिवहनकडून विशेष खबरदारी
जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच बस स्थानकात प्रवेश दिला जात आहे. यासाठी बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मास्क घातलेल्या प्रवाशांनाच बसस्थानकात प्रवेश दिला जात आहे. दररोज सॅनिटायझरची फवारणी करून बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. प्रवासादरम्यान कोणालाही धोका पोहोचू नये, यासाठी बसमध्ये प्रवासी क्षमता कमी करण्यात आली आहे.