दैनंदिन महसूल 60 लाखांवर : बस विविध मार्गांवर सुसाट
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षात कोरोनामुळे विस्कळीत झालेली बससेवा पूर्वपदावर आली आहे. विविध मार्गांवर बस सुसाट धावत असल्याने परिवहनचा महसूलदेखील वाढला आहे. दररोज 60 लाखांहून अधिक महसूल प्राप्त होत आहे. शिवाय महाराष्ट्रात देखील धावणाऱया बसची संख्या वाढल्याने महसुलात भर पडली आहे.
कोरोनाच्या उदेकामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले होते. दरम्यान तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला होता. परिणामी कर्मचाऱयांचे वेतन देणेही कठीण झाले होते. दरम्यान राज्य सरकार परिवहनच्या मदतीला धावून आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरळीत झाली आहे. शिवाय शाळा, यात्रा-जत्रा आणि इतर ठिकाणांहून परिवहनला अधिक उत्पन्न मिळत आहे.
बसस्थानकातून राज्यांतर्गत बससेवेबरोबर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, मिरज, कोल्हापूर, राजापूर, वेंगुर्ला, सावंतवाडी, चंदगड, आजरा आदी ठिकाणी 84 बसेस धावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून परिवहनला दैनंदिन 8 ते 10 लाखांचा महसूल मिळत आहे. बेळगाव विभागातून चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या सात आगारातूनही बससेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा काही प्रमाणात सक्षम होताना दिसत आहे.
कोरोना काळात बस जाग्यावर थांबून राहिल्याने उत्पन्नही पूर्णपणे थांबले होते. दरम्यान परिवहनचे आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र आता बससेवा पूर्वपदावर आल्याने हळूहळू उत्पन्नात वाढ होत आहे. मात्र अद्यापही परिवहन निर्धारित उत्पन्न उद्दिष्टापासून दूरच आहे.
बसपासमधून उत्पन्न
यंदा 36 हजार विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले. त्यामुळे गतवषीच्या तुलनेत यंदा बसपास घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसपासच्या माध्यमातूनही परिवहनचा महसूल काही प्रमाणात वाढला आहे.
होळीचा फटका
होळी, धुलीवंदन तेंडावर आल्यानेदेखील महसूलावर विपरित परिणाम झाला आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने महसूल 5 लाखाने कमी झाला आहे. मात्र धुलीवंदनानंतर पुन्हा महसूल पूर्वपदावर येईल, अशी आशा आहे. एप्रिल महिन्यात लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा परिवहनला आहे.
महाराष्ट्रात दररोज 84 बसेस
विविध मार्गांवर आणि महाराष्ट्रात बससेवा सुरळीत झाल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुण्यासह कोकणातही बससेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 84 बस दररोज धावत आहेत. त्यातून अंदाजे आठ ते 10 लाखांचा महसूल मिळत आहे.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी)