अतिवृष्टी, लॉकडाऊन-संपामुळे परिवहन मंडळाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षात परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागाला अतिवृष्टी, लॉकडाऊन आणि संपामुळे तब्बल 148 कोटींचा फटका बसला आहे. परिवहन मंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने परिवहन अडचणीत आले आहे. परिणामी या खात्यात काम करणाऱया कर्मचाऱयांचे वेतन वेळेत मिळाले नव्हते. बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या विभागांतून कोटय़वधी किलोमीटरचा प्रवास करणाऱया बस जाग्यावर थांबून राहिल्याने महसूलही शुन्यावर आला होता. त्यामुळे परिवहनला प्रचंड फटका बसला
आहे.
कोरोनापूर्वी बेळगाव विभागातून दररोज 750 हून अधिक बस विविध मार्गांवर धावत होत्या. त्यामुळे दैनंदिन 70 ते 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षापासून परिवहनला निर्धारित उद्दिष्टापासून दूर रहावे लागले आहे. दरम्यान, बेळगाव विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न हे महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून मिळते. मात्र, मागील दीड वर्षापासून कर्नाटक-महाराष्ट्र ही आंतरराज्य बससेवाही म्हणावी तशी सुरळीत सुरू नाही. त्यामुळे परिवहनला महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून मिळणाऱया उत्पन्नापासून दूर रहावे लागले आहे.
2019 मध्ये अतिवृष्टीमुळे 3 कोटी 80 लाखाचा फटका
2019 मध्ये जुलै-ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. दरम्यान, अनेक ठिकाणचे रस्ते बंद होते. त्यामुळे काही दिवस बससेवाही ठप्प झाली होती. त्यामुळे याकाळात परिवहनला 3 कोटी 80 लाखाचा फटका बसला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यंदादेखील बससेवा काही काळासाठी बंद होती. शिवाय परिवहनच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे पंधरा दिवस बससेवा ठप्प झाली होती. यंदादेखील संप आणि लॉकडाऊनमुळे परिवहनला 35 कोटींचा फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे 110 कोटीचे नुकसान
गतवषी लॉकडाऊनमुळे साधारण तीन महिन्यांहून अधिक काळासाठी सर्व प्रकारची बससेवा ठप्प झाली होती. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेलादेखील म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात परिवहनला 110 कोटींचा फटका बसला आहे.
शहरातील स्मार्ट रस्त्यांचाही फटका
स्मार्ट सिटीअंतर्गत शहर परिसरात विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते बंद ठेवण्यात येत आहेत. काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे परिवहनच्या बसना वळसा घालूनच प्रवास करावा लागत आहे. परिणामी प्रवासीही मिळेनासे झाले आहेत. मागीलवषी स्मार्ट रस्त्यांच्या कामांमुळे काहीकाळ बससेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे परिवहनला स्मार्ट रस्त्यांचादेखील फटका बसला होता.
नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन प्रयत्नशील
परिवहनच्या बेळगाव विभागाला मागील दोन वर्षात तब्बल 148 कोटींचा फटका बसला आहे. अतिवृष्टी, लॉकडाऊन व संपामुळे बससेवा ठप्प झाल्याने हा फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन प्रयत्नशील आहे. मात्र, अद्यापही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रवासी नसल्यामुळे बसफेऱया बंद ठेवाव्या लागल्या आहेत.
-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी केएसआरटीसी)