कठीण निर्बंधांमुळे उत्पन्नावर सोडावे लागतेय पाणी
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाला 560 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मागील दीड महिन्यांपासून प्रवासी बससेवा ठप्प असल्यामुळे परिवहनचे उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी येथील कर्मचाऱयांना वेतन देण्यासाठी राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी झाल्याने बसेस रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. त्यामुळे परिवहनच्या चारीही निगमना एकूण 560 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. शिवाय यापूर्वी विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने देखील कोटय़वधींचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतानाच परिवहन महामंडळाला लॉकडाऊनचा फटका बसत आहे.
दिवसाला 14 कोटींचे नुकसान
परिवहनची बससेवा एक दिवस बंद राहिली तर चारीही निगमना सुमारे 14 कोटी रुपयांचा फटका बसतो. बेंगळूर सहर परिवहन मंडळाचे (बीएमटीसी) दिवसाचे उत्पन्न 2.5 कोटी रु. ते 3 कोटी रु. इतके आहे. लॉकडाऊन जारी होवून 40 दिवस उलटले आहेत. त्यामुळे बीएमटीसीला आतापर्यंत 120 कोटी रु. उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. तर केएसआरटीसीला दिवसाला 7 कोटी रु. प्रमाणे 40 दिवसांत एकूण 280 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वायव्य आणि ईशान्य परिवहन निगमना दिवसाला 2 कोटी रु. प्रमाणे 40 दिवसांत प्रत्येकी 80 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
…तर डिझेलचा खर्चही भागणे कठीण
लॉकडाऊन 14 जूननंतर काही प्रमाणात शिथिल होणार असून बेंगळूरसह निवडक जिल्हय़ांमध्ये अंशतः बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. परंतु, बसेसमध्ये पूर्ण क्षमतेऐवजी निम्म्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करण्याची अट घालण्यात येण्याची शक्यता असून त्यामुळे मिळणाऱया उत्पन्नातून डिझेलचा खर्चही भागणे कठीण आहे.