15 मार्चपर्यंत मागण्यांबाबत ठोस निणर्य घेण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
परिवहन कर्मचाऱयांना सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा मिळावा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन छेडले होते. दरम्यान यातील काही मागण्या मान्य झाल्या होत्या. मात्र काही मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप उर्वरित मागण्या मान्य न केल्याने राज्यसरकारने येत्या 15 मार्चपर्यंत या मागण्यांबाबत ठोस निणर्य घ्यावा, अन्यथा पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱयांनी दिला आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन छेडले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाचा राज्य सरकारबरोबर परिवहनला फटका बसला होता. दरम्यान काही मागण्या मान्य करण्यात आल्या मात्र अद्यापही उर्वरित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने परिवहन कर्मचारी आंदोलनासाठी तयारीत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून सेवा बजाविणाऱया कर्मचाऱयांना न्याय मिळाला नाही. सरकारी सेवेत त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे शासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा देण्याबरोबर इतर 9 मागण्या 15 मार्चपर्यंत मान्य कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱयांनी केली आहे. परिवहनचे कर्मचारी रात्री-दिवस सेवा बजावतात. मात्र त्यांना दुय्यम दर्जा मिळतो. सरकार न्याय देण्यास टाळाटाळ करत आहे. या विरोधात लवकरच आक्रमक भूमिका घेवून आंदोलन छेडण्याची तयारी संघटनेने केली आहे.