प्रतिनिधी/ बेंगळूर
सरकारी कर्मचारीपदाचा दर्जा, वेतनवाढीसह विविध 10 मागण्यांसाठी अलीकडेच चार दिवसांचा संप पुकारलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांचे चार दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या भूमिकेबद्दल परिवहन कर्मचाऱयांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसनेदेखील सरकारच्या या निर्णयाचे खंडन केले आहे.
सेवेत गैरहजर असल्याचे गृहीत धरून परिवहन कर्मचाऱयांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे. मात्र, सरकारच्या या भूमिकेला आक्षेप घेण्यात आला आहे. हजेरीपुस्तिकेत गैरहजेरीऐवजी रजा दाखवून त्या चार दिवसांचे वेतन द्यावे, अशी मागणी परिवहन कर्मचाऱयांनी केली आहे.
मागील आठवडय़ात शुक्रवारपासून चार दिवस परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारून आंदोलन छेडले होते. विमा सुविधा, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ, सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा अशा एकूण 10 मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 9 मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर सोमवारी दुपारपासून परिवहन कर्मचाऱयांनी बससेवा सुरू केली होती.