इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन : प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी/ बेंगळूर
परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने 15 टक्के वेतनवाढ दिली आहे. मात्र, परिवहन कर्मचारी संघटनांच्या विविध कृती समित्यांनी ही वेतनवाढ फेटाळली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत विविध मागण्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचा 21 मार्च रोजी होणारा संप मागे घेण्यात आला आहे.
राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी करत 21 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी परिवहन कर्मचाऱ्यांना 15 टक्के वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी राज्य सरकारने 15 टक्के वेतनवाढीचा आदेश जारी केला होता. मात्र, यापूर्वी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा नेमणूक करणे, वर्षाला नियमित वेतनवाढ यासह विविध मागण्यांविषयी कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या 8 ट्रेड युनियन्सनी 21 रोजीचा संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
अखेर शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी इतर मागण्यांबाबत ठोस आश्वासन दिले. त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व सांभाळणारे अनंत सुब्बराव यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. जनतेला कोणत्याही कारणास्तव समस्या निर्माण करण्याचा हेतू नाही. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.