प्रतिनिधी/मुंबई
परिवहन मंत्री अनिल परब यांचे कामगारांना कामावर रुजू होण्याचे आवाहन आणि महामंडळाने प्रसिद्ध केलेले निवेदन याचा योग्य तो परिणाम होत आज अनेक आगारांतून एसटी कर्मचारी त्यांच्या कर्त्यव्यावर हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी रस्त्यावर आली असून राज्यभरात 826 एसटी बसेस रस्त्यावर आल्याचे एसटी प्रशासनानतर्पे सांगण्यात येत आहे.
गेले 15 दिवस विविध आगारांमध्ये झालेले आंदोलन आणि चार दिवस संपमुळे राज्यभरातल्या आगारांमध्ये शुकशुकाट होता. एकही गाडी रस्त्यावर आली नव्हती. मात्र संपाचा विपरीत परीणाम लक्षात घेऊन आता काही कामगार कर्तव्यावर येऊ लागले आहेत. मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी सातार्याच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज्यभरात 826 गाडÎा रस्त्यावर धावत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे संप संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अक्कलकोट आगारातून काही बसेस सुटल्या असून रत्नागिरी विभागातील राजापूर आगारातूनही एसटी रवाना झाली.
विनासंकोच कामावर रुजू व्हा
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी विविध आगारातून 826 बसेस बाहेर पडल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालय, औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने नकार देऊनही संप सुरू असल्याने अवमान याचिकाही दाखल आहे. प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही कामगारांना कामावर यायचे आहे. त्यांनी विनासंकोच कामावर यावे. कामावर येणार्यांची कोणी अडवणूक करू नये, असे आवाहन चन्ने यांनी केले.
खासगी वाहनाना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली असली तरी त्यांच्याकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असे चन्ने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मॅकेनिकल ऑन ड्यूटी
एसटी गाड्या काही प्रमाणात आज बाहेर पडल्यानंतर त्यांची देखभाल करणारा मेपॅनिकल स्टाफ कामावर यायला सुरुवात झाली आहे. दोन हजारांहून जास्त कर्मचारी कामावर आले आहेत. महामंडळात 92 हजार 700 कर्मचारी आहेत. महामंडळाला गरज भासल्यास ट्रेनिंग पूर्ण झालेल्या कामगारांना भरती करून घ्यायचा विचार आहे. पण अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, असेही चन्ने यांनी सांगितले. डेपो सुरू करा असे कर्मचारीच सांगत आहेत. आम्ही डेपो सुरू करतोय, पण कर्मचार्यांनी कामावर यावे असे आवाहन चन्ने यांनी केले.
कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी नव्हे
एसटीची तोडफोड केल्याप्रकरणी 36 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच कामगारांना संप करण्यास भाग पाडल्याने दोन हजारांहून अधिक कामगारांचे निलंबन झालेले आहे. मात्र त्यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही, असे चन्ने यांन स्पष्ट केले. म्हणजे कामगार कामावर रुजू झाले तर त्याचे निलंबन रद्द होऊ शकण्याची आशा आहे.
…तर नव्या भरतीचा विचार
सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांचाही विचार करावा लागतो. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असे अनिल परब म्हणाले. अजूनपर्यंत दोन हजारांहून अधिक एसटी कर्मचार्यांना निलंबित केले आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. कामावर येणार्या कर्मचार्यांना संरक्षण दिले जाईल आणि जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे -शरद पवार भेट
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, प्रवाशांच्या हालअपेष्टा आणि कर्मचार्यांच्या कुटुंबीयांवर येणारी उपासमारीची वेळ या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यामुळे संप मागे घेण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन थांबावे व त्यांनी कामावर रुजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. तरीही कर्मचार्यांनी संप मागे घेतलेला नाही. कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम, तर सरकारचा कारवाईचा बडगा आहेत. परिणामी एसटी वाहतूक ठप्प झाली असून, या सार्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचार्यांचे प्रतिनिधित्व करणार्या एका प्रतिनिधी मंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेत तोडगा काढण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हाती आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सूचनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालन करतील. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीतून काय निष्पन्न होते याकडे एसटी कामगारांच्या नजरा लागल्या आहेत.