केएसआरटीसी कर्मचारी संघाच्या अध्यक्षांच्या उलटसुटल विधानामुळे गोंधळ
प्रतिनिधी/ बेंगळूर
रविवारी परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या उपस्थितीत परिवहन कर्मचारी संघटनेशी झालेली चर्चा यशस्वी झाल्याचे वाटत असतानाच संपकरी कर्मचाऱयांनी अचानक घुमजाव केल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या वेळी घेतलेली भूमिका संघटनेच्या अध्यक्षांनी बदलल्याने संप सुरूच राहणार अशी चिन्हे दिसत आहेत.
बेंगळूरच्या फ्रिडम पार्क येथे बोलताना केएसआरटीसी संघाचे राज्याध्यक्ष चंद्रू यांनी, वाहतूक मंत्र्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे असे स्पष्ट केले. आमच्या कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी पदाचा दर्जा देईपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे. ही घोषणा हाईपर्यंत कोणत्याही कर्मचाऱयाने बस रस्त्यावर उतरवू नये, असे आवाहन केले आहे. पण त्याआधी चंद्रू यांनी सवदी यांच्याशी झालेली चर्चा सफल झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे संप मिटण्याची आशा निर्माण झाली होती. पण नंतर त्यांनी याच्या नेमकी उलट भूमिका घोषित केल्याने गोंधळात भर पडली असून सर्वसामान्य प्रवाशांना आणखी किती काळ बससेवा सुरळीत होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संघटना अध्यक्ष, मंत्री यांच्यात चर्चा
यापूर्वी विकाससौधमध्ये रविवारी केएसआरटीसी संघाचे राज्याध्यक्ष चंद्रू आणि वाहतूक मंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह अनेकांची संप मागे घेण्याबाबत बैठक झाली. बैठकीतील चर्चा संपल्यानंतर बाहेर आलेल्या चंद्रू यांनी बैठक यशस्वी झाली असून सरकारने आपल्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संप मागे घेतल्याचे सांगितले होते. मात्र, फ्रिडम पार्क येथे आल्यानंतर चंद्रू यांनी घुमजाव केले. सरकारशी आणखी एकदा चर्चा करणे बाकी आहे. सायंकाळी झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांनी संप सुरूच ठेवत कोणीही बस रस्त्यावर उतरवू नये, असे सांगितले.
सरकारी कर्मचारीपदाचा दर्जासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या तीन दिवसांपासून परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांनी संप पुकारला होता. वाहतूक खात्याची जबाबदारी घेतलेल्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय संघटनांच्या प्रमुखांनी घेतला होता. मात्र, अचानक संप सुरूच राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारची कोंडी झाली आहे.
सवदी चंद्रू यांच्यावर नाराज
दरम्यान, बोलताना परिवहन मंत्री तथा उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी, संप मागे घेण्याबाबत आयोजित बैठकीत 7-8 जण उपस्थित होते. आम्ही मान्य केलेल्या मागण्यांना सर्वांनी संमती दर्शविली होती. आता यामध्ये कोणता बदल केला आहे, याची माहिती नाही. बैठकीत आंनदाने चहा घेऊन गेले. मात्र, आंदोलनस्थळी जाऊन घुमजाव केला आहे. त्याठिकाणी असलेल्यांनी त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण केला असेल, असे स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली.
रविवारी दुपारी 1 पासून सायंकाळी 7 पर्यंत कर्मचाऱयांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. आम्ही मान्य केलेल्या मागण्यांचे पत्रही त्यांना दिले होते. तसेच त्यांनी पत्रकारांसमोर वाचूनही दाखविले होते. याठिकाणी संप मागे घेतल्याचे जाहीर करून आंदोलनस्थळी घुमजाव केला आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे अशक्य आहे. त्यांनी केलेल्या बहुतेक सर्व मागण्या मान्य केल्या होत्या, असेही ते म्हणाले.
एका निगमातील कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी पदाचा दर्जा दिल्यास सर्व निगमातील कर्मचारी सदर मागणी करतील. त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. सोमवारपर्यंत संपकऱयांचे मनपरिवर्तन होईल आणि ते बससेवा सुरू करतील, असा विश्वास आहे. मात्र, पुन्हा बैठक घेण्यास त्यांनी नकार दिला. तसे केल्यास सरकारची नाचक्की होईल, असे वक्तव्य त्यांनी केले.