प्रतिनिधी / पणजी
दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांनी काल सोमवारी मुख्यमंत्र्याच्या आल्तिनो येथील बंगल्यावर मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पेडणे पोलिसस्थानकात नेऊन ठेवले, नंतर त्यांना सोडण्यात आले.
कोरोनाचा फैलाव वाढत असताना परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशभरतील नीट व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून गोव्यातही दहावी बारावीच्या परिक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थी करीत होते.
पर्वरी येथेही निदर्शने
पर्वरी येथे शालांत मंडळासमोरही काहींनी निदर्शने केली. त्यामध्ये काही विद्यार्थी तसेच पालक होते. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्तेही आले होते.
परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घ्याव्यात
गोवा मुख्याध्यापक संघटना आणि गोवा प्राचार्य संघटनेचे पदाधिकारी तसेच काही संबंधित पालकांनी गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटे यांची भेट घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्हायलाच हव्यात अशी मागणी केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी झालेल्या हव्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
बोर्डाकडून सर्व ती तयारी, पुढील निर्णय सरकारवर
या दोन्ही परीक्षांसाठी बोर्डाने मोठय़ा प्रमाणात तयारी केली असून कोरोनाच्या या काळातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे कडक पालन करण्यात येणार आहे. एकदा पालकांनी मुलांना वर्गापर्यंत पोहोचविले की त्यांची पूर्ण सुरक्षा करण्यासाठी बोर्डाने सर्व ती काळजी घेतली आहे. यापुढील निर्णय सरकारवर अवलंबून आहे, असे शेटय़े यांनी या सर्वांना सांगितल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : आरोग्यमंत्री कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्यात जमावबंदी करणे अत्त्यावश्यक आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांना दहावी बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न विचारला असता आरोग्यमंत्री म्हणाले की राज्यात कोरोनाबाबत परीक्षा पुढे ढकलाव्यात की नाहीत, याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार असल्यो सांगितले.