विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी, जिल्हाधिकाऱयांकडून परीक्षा केंद्रांची पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाऱया एसएसएलसी परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ झाला. कोरोनामुळे शिक्षण विभागाने खबरदारी घेतली होती. कोरोनामुळे आपापल्या गावी परतलेल्या नागरिकांना परीक्षेमुळे पुन्हा शहराकडे यावे लागले. परीक्षा जरी विद्यार्थ्यांची असली तरी त्याचे दडपण पालकांवरच अधिक दिसत होते. यावर्षी परीक्षेचे स्वरुप बदलले गेले असले तरीही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरली. दरम्यान, कोरोनाच्या छायेखाली होत असलेली ही परीक्षा महत्त्वाची असल्याने खुद्द जिल्हाधिकाऱयांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनामुळे दहावीची परीक्षा केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह होते. बारावीची परीक्षा रद्द झाल्याने दहावीच्या परीक्षेचे काय होणार? याबाबत साशंकता होती.
परंतु शिक्षण विभागाने ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी यातील गणित, विज्ञान व समाज विज्ञान अशा तीन विषयांचा एकत्रितपणे 120 गुणांचा पेपर घेण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी परीक्षा केंद्रांसमोर गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी केंद्रांवर मार्किंग करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. सरदार्स हायस्कूल येथे परीक्षा केंद्राच्या एका वर्गात पावसाचे पाणी आल्याचे त्यांनी पाहिले व तेथील विद्यार्थ्यांची दुसऱया वर्गात बसण्याची सोय करून दिली.
विद्यार्थ्यांच्या तापमानाची करण्यात आली नोंद
परीक्षा केंदावर विद्यार्थी दाखल झाल्यानंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, बैठक क्रमांक, त्याच्या शरीराचे तापमान या सर्वांची नोंद परीक्षा केंद्रावर केली जात होती. त्यानंतर त्यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात येत होते. विद्यार्थ्यांची तपासणी तसेच इतर कामे करण्यासाठी स्काऊट-गाईड, आशा कार्यकर्त्या यांची नेमणूक करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोफत बससेवेला अल्पप्रतिसाद
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचणे सोयीचे व्हावे, यासाठी राज्य सरकारने एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना मोफत बससेवा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अद्याप बसची संख्या कमी असल्यामुळे पालकांनीच आपल्या मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडले. ग्रामीण भागातून येणाऱया विद्यार्थ्यांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला. परंतु एकूण चित्र पाहता परिवहन मंडळाच्या मोफत बससेवेला अल्पप्रतिसाद मिळाला.
सलग तीन तास परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. परीक्षा केंद्रातून बाहेर येताच बिस्किटाचा पुडा हाती मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी अनपेक्षित होते. त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळीत याची चर्चा सुरू होती.
विविध शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना परिपत्रके
परीक्षा देऊन विद्यार्थ्यांनी बाहेर येण्याचा अवकाश, की विविध शिक्षण संस्थांची परिपत्रके विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे आढळून आले. या परिपत्रकांमध्ये आपल्या कॉलेजची जाहिरात, गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आणि एकूण अभ्यासक्रम याची माहिती होती. या परिपत्रकांनी विद्यार्थ्यांचे खिसे भरून गेले आणि शिक्षण संस्थांनी परीक्षेचा कालावधीसुद्धा एनकॅश केल्याचे दिसून आले.
शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी-पालकांची धावपळ
शिक्षण विभागाने दिलेल्या हॉलतिकीटमध्ये पूर्ण पत्ता नमूद करण्यात आलेला नसल्याने परीक्षा केंद्र शोधण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे परीक्षेपूर्वीच परीक्षा केंद्राला भेट देऊन पत्ता तपासावा, असे आवाहन शिक्षकांनीही केले होते. तरीही सोमवारी परीक्षा सुरू होण्यास काही मिनिटे असताना परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू होती. अनेकांना परिसर परिचित नसल्याने ही समस्या जाणवत होती.