प्रतिनिधी / सांगली
विद्यार्थ्यांनी परीक्षेला ताण किंवा संकट न समजता परीक्षा म्हणजे विद्यार्थी जीवनातील मोठा उत्सव आहे, असे समजून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य–संस्कृत शिक्षक रघुवीर रामदासी यांनी केले. विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या गुळवणी शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना रामदासी म्हणाले, त्यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला ताण किंवा संकट न समजता परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक व बौद्धिक क्षमतांचा विकास करणे गरजेचे आहे. यासाठी थोर महापुरुषांच्या जीवन चरित्राचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केल्यास मोठी प्रेरणा मिळू शकते. विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून स्वतःला आत्मसन्मानित केले पाहिजे, तरच आपण कोणत्याही परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो असे मत त्यांनी मांडले.
संस्थेच्या सचिव मेधाताई गुळवणी यांनी आपण सतत परिश्रम केल्यास आपल्याला निश्चित यश मिळू शकते असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डि.पी. कुलकर्णी यांनी केले. यावेळी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास संचालक सुरेश पाटील यांच्यासह सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.