नळपाणी योजना, व्यापाऱयांना फटका
प्रतिनिधी / परुळे:
परुळे परिसराला आंदुर्ले उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येतो. गेला आठवडाभर या परिसरात रात्रीच्या वेळी वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. तो दुसऱया दिवशी तब्बल चौदा ते पंधरा तासानंतर सुरळीत होतो. याचा मोठा फटका परिसरातील नळपाणी योजना व व्यापाऱयांना बसत आहे.
बुधवारी व गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गेले दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाला. तो तब्बल दुसऱया दिवशी चौदा-पंधरा तासानंतर सुरळीत झाला. त्यामुळे येथील ग्राहक त्रस्त झाले असून महावितरणने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मात्र त्यांच्या नशिबी अंधार
मुंबईसारख्या महानगरात तीन तास वीज गायब झाली, तर सर्व मंत्रिमंडळ खडबडून जागे होते. ग्रामीण भागात भरमसाट वीज बिले येऊनही ग्राहक प्रामाणिकपणे ही वीज बिले भरतात. मात्र, त्यांच्या नशिबी रात्री अंधार असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणाऱया वीज पुरवठय़ाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
..तर विजेचा विमानतळाला काय उपयोग?
परुळे परिसरातूनच चिपी येथील विमानतळाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. भविष्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर अशाप्रकारे वीज चौदा-पंधरा तास गायब राहिली, तर या विजेचा विमानतळ प्रकल्पाला काय उपयोग? फक्त कागदोपत्री वीज पोचली एवढे भासविण्यासाठी वीज कनेक्शन देण्यात आले आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
वीज वाहिन्या जंगलातून
परुळे-आजारवाडी, शेळपी परिसरातील जंगलातून वीज वाहिन्या आल्याने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी या भागात फिरकत नाहीत. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित राहतो, याकडे महावितरणने गांभीर्याने पाहून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील वीज ग्राहकांकडून होत आहे.