प्रतिनिधी/ पणजी
आंतरराज्य सीमा खुल्या झाल्यापासून गोव्यात येऊ लागलेले देशी पर्यटक कोविड महामारींच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. गोव्यात येणाऱया पर्यटकांनी शिस्तीने वागणे आवश्यक आहे. पर्यटकांबरोबरच समुद्रकिनाऱयावर तैनात असलेले पोलिस अधिकारीही अशा वागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि धूडगूस घालणारे पर्यटन गोव्याला खरेच अपेक्षित आहे का असा प्रश्न सर्व स्तरावर उपस्थित केला जात आहे.
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने आर्थिकदृष्टय़ा विचार करून पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आंतरराज्य सीमाही खुल्या करण्यात आल्या. परंतु जसजसा राज्यात पर्यटकांचा ओघ वाढू लागला तसतसा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि गोंधळ जास्त प्रमाणात दिसून येऊ लागले. सध्या राज्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱयावर मोठय़ा प्रमाणात पर्यटकांचा ओघ दिसून येतो. परंतु हे सुशिक्षित पर्यटक मास्क न घालता आाणि मार्गदर्शक तत्त्वांना न पाळता मुक्तसंचार करत आहेत. मिरामार समुद्रकिनाऱयांवर दोन तीन कुटुंबे मास्क न घालता पाण्यात खेळताना तसेच रेतीत खेळताना दिसून आली. याचबरोबर पर्यटक तर सोडाच निरीक्षक म्हणून तैनात असलेले पोलिसही योग्यप्रकारे मास्क न घालता पर्यटकांशी बोलताना दिसून येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी मनपातर्फे मिरामार येथे मास्क न घालता फिरणारे तसेच मार्गदर्शक तत्त्वे न पाळणाऱया पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली होती. परंतु अजूनही मिरामार समुद्रकिनाऱयावर मास्क न घालता मजा लुटणारे अनेक पर्यटक दिसून येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी पोलिस तैनात असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. मार्गदर्शक तत्त्वांबाबत पालन करण्यासाठीही कुणीही सांगत नाहीत. अशा गोष्टींवर जरब बसणे आवश्यक आहे. नाहीतर हे पर्यटन गोव्यासाठी धोकादायक ठरेल.
पणजी मार्केटच्या काही दुकानांमध्येही मास्क न घालता फिरणारे अनेकजण दिसतात. हॉटेलच्याबाहेर, दुकानात खरेदी करताना स्थानिक व पर्यटक मास्क न घालताना तसेच सामाजिक अंतर पाळताना दिसत नाहीत. अशांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे.
1 सप्टेंबरपासून आंतरराज्य सीमा खुल्या झाल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून मोठय़ा प्रमाणात विदेशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या काळात पर्यटकांना गोव्यात येता आले नव्हते. आता सीमा खुल्या झाल्यावर देशी पर्यटकांचा ओघ खूप वाढला आहे. परंतु पर्यटकांचे स्वैर वर्तन पाहता नजीकच्या काळात स्थानिकांबरोबर त्यांचा संघर्ष होऊ शकतो अशी चिन्हे दिसून येत आहेत.
सीमा खुल्या झाल्यानंतर पर्यटक मोठय़ा प्रमाणात राज्यात येत आहेत. शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस जास्त प्रमाणात पर्यटक येतात. परंतु मौजमजा करण्याच्या नादात पर्यटक मास्क आणि सामाजिक अंतर पाळत नाहीत. स्वैर वर्तन पर्यटकांकडून होत आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध येण्यासाठी मनपातर्फे विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 174 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.