शासनाकडून धोरण म्हणून काही बंधने जरूर येतील पण त्यामागचा हेतू काय आहे हे जाणून लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
दिवाळी सण आनंदात पार पडला. यावेळी मुंबई पुण्याचे चाकरमानी किंवा अन्य ठिकाणचे मूळचे कोकणवासीय आपल्या गावाकडे मर्यादित स्वरुपात आले. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी त्याचा धोका अद्याप दूर झालेला नाही याची जाणीव ठेवली गेली. यामुळे तुलनेने कमी पाहुणे मंडळी कोकणात आली. कोरोना नियंत्रणाचा दर कमी राहिल्याच्या अनेक कारणांमध्ये हेही एक कारण ठरावे. शनिवारी रत्नागिरी जिह्यातील दापोली-पाळंदे समुद्रकिनारी गेल्या शनिवारी 8 पर्यटक बुडाले त्यापैकी 6 जणांना वाचवण्यात यश आले तर दोघे जण मृत्यूमुखी पडले. मृत्यू पावलेले दोघेजण 19 व 16 वर्षांचे होते. सोबतचे तरुणही याच वयोगटातील होते. रायगड जिह्यातील मडाय येथून हे तरुण समुद्राची सहल करावी म्हणून किनाऱयावर आले होते. समुद्राच्या कडेचा विशिष्ट दलदलीच्या प्रदेशाचा अंदाज न आल्याने ते संकटात फसले. समुद्रकिनारी थांबणे, समुद्रात पोहणे असे एकाहून एक आनंदाचे उपक्रम असतात. तरुणाईतील लोक आव्हान पत्करून आनंद मिळवण्यासाठी पुढे होतात. जोखीम व धोक्यांची पुरेशी माहिती करून न घेता समुद्राकडे वळणारे पर्यटक मोठय़ा अडचणीत सापडतात. अंदाजापेक्षा वेगळे समुद्रातील पाण्याचे प्रवाह घातक ठरतात. किनाऱयाची दलदल ही देखील कमी धोकादायक नसते. पर्यटकांनी उत्साहाच्या भरात समुदाकडे धाव घेतली खरी पण अडचणीच्या वेळी मदत मिळू शकेल अशी कोणतीच व्यवस्था माघारी नव्हती.
रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळे असो किंवा सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक समुद्रकिनारे असोत, पर्यटकांना भुरळ पडत नाही असे ठिकाण अपवादानेच आहे. समुद्रकिनारे जेवढे आकर्षक वाटतात तेवढेच त्यात वावरणे जोखीमांनी भरलेले असते. त्याची पूर्वकल्पना किनाऱयावर येणाऱया पर्यटकांना नसते. पर्यटक मंडळी किनाऱयावरील लोकांच्या सूचना ऐकण्याच्या मनस्थितीतदेखील नसतात.
शनिवारी दापोली-पाळंदे येथे बुडालेले सर्व पर्यटक कोकणातीलच महाड या ठिकाणाहून आले होते. कोकणातील लोकांना खरेतर समुद्र म्हणजे नाविन्याची बाब नाही. समुद्रासोबत आनंदक्षण घालवताना जोखीम भरल्या पळांची जाणीव आवश्यक असते. कोकणाबाहेरच्या लोकांना समुद्राची जाणीव पुरेशी नसल्याने ते अनपेक्षित पणे पुढे झाले असे म्हणता येऊ शकते. परंतु कोकणातील लोकांना समुद्राच्या धोकादायकतेची जाणीव नाही असे कसे म्हणता येईल हा प्रश्नच आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेताना काही श्रेणी ठरवून देण्यात आल्या आहेत. स्वच्छता त्याचबरोबर धोकादायकता ओळखण्यासाठी अशा श्रेणींचे मानदंड ठेवण्यात आलेले आहेत. भारतात अनेक पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. केवळ त्यांच्या उपस्थितीत समुद्रकिनारी फिरणे किंवा जलक्रीडेचा आनंद घेणे शक्य होत असते. सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्रातदेखील असा प्रयत्न अनेक पर्यटन क्षेत्रात करण्यात आला. सुरक्षा रक्षकांची व्यवस्था उभारणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिकदृष्टय़ा आवाक्याबाहेर गेल्याने प्रत्येक जोखीमस्थळी सुरक्षारक्षक नेमण्याच्या मुद्यावर हात आखडता घ्यावा लागला आहे. सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून निवडक क्षेत्रे घोषित करण्यासाठी आता सरकारने पुढाकार घ्यायला हवा. सुरक्षारक्षकासह अन्य मदतीची प†िरपूर्ण हमी देऊन सुरक्षित समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आश्वासित करता येईल. शनिवारी दापोली-पाळंदे येथे आठ जण बुडाल्याची पार्श्वभूमी असताना रविवारी आणखी काही पर्यटक तेथे आले. गावकऱयांनी नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेविषयी त्यांना कल्पना दिली. समुद्राशेजारच्या दलदल म्हणजे स्थनिक भाषेत त्याला चाळ म्हणतात तेथे अजिबात जाऊ नका असे पर्यटकांना सांगण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून झाला. परंतु या सूचना अव्हेरण्यात आल्या. असे उत्साही लोक असतील तर संकटे दूर नाहीत अशी परिस्थिती आहे. राज्य सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी नुकतीच †िदली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर असो किंवा रत्नागिरी तालुक्यातील पावस-गणपतीपुळे अशी क्षेत्रे असोत, याठिकाणी लोकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची उत्सुकता असते. कोरोना काळात बंद असलेली ही मंदिरे आता उघडली असली तरी रोगाचे भय कमी झालेले नाही उलट कोरोनाच्या आणखी एखाद्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी देखील कोकणातील मंदिर व्यवस्थापनातील लोक सज्ज होत आहेत. मंदिरात जायचे म्हणजे पूर्णपणे स्वच्छतेनिशी जावे असा प्रघात आहे. लोक त्यासाठी प्रयत्नही करतात. परंतु सोबतच्या लोकांचा खूप मोठा उत्साह असल्याने कोरोना विषयक सामाजिक अंतराचे पालन कसे होणार या मोठा प्रश्न आहे. मंदिरात लहान मुलांना वावरण्यावर प्रतिबंधाच्या चौकटी निश्चित केल्या असल्या तरी अशा वावरातून कोरोनाच्या प्रसाराच्या काही शक्यता निश्चितच उरतात. मंदीर व्यवस्थापन सॅनिटायझर, मुखपटी याबाबतीत काही बाबींचा आग्रह धरत असले तरी सामाजिक अंतर राखले जावे म्हणून सजग पहारा ठेवला गेला तरच नियंत्रण शक्य होणार आहे. शासनाकडून धोरण म्हणून काही बंधने जरूर येतील पण त्यामागचा हेतू काय आहे हे जाणून लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
समुद्रकिनारी जलक्रीडा करणारे पर्यटक असोत अथवा किंवा मंदिरात जाणारे भाविक असोत या सर्वांना कठोर नियमनासाठी सज्ज रहावे लागणार आहे. कोणत्याही पातळीवर तयार झालेला धोका परवडणारा नाही. नियमन म्हणजे धोक्यांपासून दूर राहण्याकरिता तयार करण्यात आलेली व्यवस्था होय. त्या व्यवस्थेचा आदर सर्वांनी करणे अत्यावश्यकच आहे. सुकांत चक्रदेव