रत्नागिरी / प्रतिनिधी
जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीमधील हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेल्सबाहेर लाल झेंडा लावून राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहेत़ जोपर्यंत हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळत नाही, तोपर्यंत हा लाल झेंडा फडकवणार असल्याची माहिती हॉटेल असोसिएशनचे सेक्रेटरी सुनील देसाई यांनी दिली. या कठीण प्रसंगात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत पर्यटन व्यावसायिकांना न्याय द्यावा, अशी मागणीही हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
हॉटेल असोसिएशनचे सेक्रेटरी सुनील देसाई, रवींद्र घोसाळकर, उदय लोध यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. दरवर्षी पर्यटन दिनानिमित्त पर्यटन वाढीसाठी कुठलीही सरकारी मदत न घेता संस्थेमार्फत व पर्यटन व्यावसायिकांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पण या वर्षभरात जिल्हय़ातील पर्यटन व्यावसायिक नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. दिवाळीमध्ये क्यार वादळ, डिसेंबरमध्ये वादळसदृश स्थिती व गेले 6 महिने कोरोनामुळे जिल्हय़ात पर्यटन व्यवसाय पुरता कोलमडल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
होम स्टे, हॉटेल, लॉजिग, बोटींग, वॉटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड, टुरिस्ट व्हेईकल या व्यावसायिकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आह़े या कठीण स्थितीमधून बाहेर पडणार कसे, असा प्रश्न या व्यावसायिकांना भेडसावत आहे. हा जिल्हा काही प्रमाणात पर्यटनावर आधारित आह़े स्थानिक व्यावसायिकांनी कोणतीही सरकारी मदत किंवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे केले आहेत़ कोविडमुळे संकटात सापडलेले हॉटेल व्यावसायिक शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या हॉटेलच्या बाहेर लाल झेंडा लावून आंदोलन करणार आहेत़ हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळेपर्यंत हा झेंडा फडकतच राहणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाचा निषेध करण्याचा नसून सरकारने या व्यावसायिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी हालचाल करावी व व्यावसायिकांना दिलासा द्यावा, असा आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी घेतलेली बँकांची कर्जे, थकित हप्ते, वाढलेले व्याज, हप्ते भरण्यासाठी बँकेची सक्ती, रिसॉर्टच्या कामगारांचे पगार, हॉटेल चालवायला घेतलेल्या व्यवसायिकांच्या भाडे-डीपॉझिट समस्या, पर्यटन बंद काळातील वाढीव वीज बिले, पर्यटन सुरु केले तरी अत्यल्प प्रतिसाद, बंद काळातील नुकसानाची भरपाई अशा अनेक समस्यांवर सरकार पर्यटन व्यावसायिकांसोबत येणे गरजेचे आह़े याविषयी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आह़े या आंदोलनात जिल्हय़ातील पर्यटन हॉटेल व्यावसायिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आह़े