प्रतिनिधी / असळज
पर्यटनाच्या नावाखाली अणदूर, कोदे, वेसरफ, लखमापूर या ठिकाणी मद्यपी पर्यटकांनी उच्छाद मांडला जात असून पोलिसांनी अशा व्यक्तींवर कडक कारवाई करणेची गरज असल्याची मागणी नागरिकातून होत आहे. तेथील सामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे.कोरोनाच्या काळात शांत वाटणारा तलावांचा परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला असून त्या मध्ये मद्यधुंद पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महिला वर्गासह सामान्य नागरिकांना त्या ठिकाणहून जाताना भीती वाटत आहे.
अणदूर तलाव तर कित्येक मद्यपी पर्यटनाचा अड्डा बनत चालला असून डी.जे.च्या तालावर असणारे मद्यधुंद पर्यटक उच्छाद मांडत आहेत. तलावाभोवती दारूच्या बाटल्यांचा ढीग पडला असून एक प्रकारे तलाव परिसर तळीरामांचा अड्डा बनत चालल्याचे चित्र दिसत आहे.अणदूर ग्रामपंचायतीने याबाबत वेळोवेळी जनजागृती केली असून काही रंगे हात तळीरामांना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. त्यांना समज देवून सोडण्यात आले. त्यामुळे तेथील प्रशासकीय यंत्रणा यामुळे त्रासली असून पोलिस प्रशासनाने यावर कडक कारवाई करणेची गरज आहे. परंतु अशा परिसरातील वातावरण बिगडून जात असून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुट्टीचा दिवस व रविवार या वेळी पोलिस यंत्रणेने या ठिकाणी गस्त घालण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
मद्यपींचा अड्डा बनणे धोकादायक
अणदूर यासह इतर तलाव मद्यपी व्यक्तींचा अड्डा बनणे धोकादायक झाले असून त्यामुळे कोणताही अघटीत घटना घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेने याठिकाणी सुट्टी व रविवार या दिवशी किमान गस्त घालणेची गरज आहे.
श्री. दत्तात्रय गोविंद गुरव – सरपंच अणदूर ता.गगनबावडा