प्राचार्य रा. तु. भगत यांचे प्रतिपादन निवृत्त वायूसैनिक मुरलीधर देसाई लिखित ‘माझी भ्रमंती’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / कोल्हापूर
जो माणूस समाजात मिसळत नाही. समाजात समरस होत नाही, तो नेहमीच दुःखी असतो. पर्यटनांमुळे माणूस अधिक समृद्ध होतो, म्हणूनच शक्य झाल्यास प्रत्येकाने जगाची सफर करायला हवी, असे प्रतिपादन संत गाडगे महाराज अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी येथे केले. निवृत्त वायू सैनिक मुरलीधर देसाई यांच्या ’माझी भ्रमंती’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
करवीर नगर वाचन मंदिर येथे दादूमामा ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांची उपस्थिती होती. तर ज्येष्ठ कवी श्याम कुरळे, प्रा. किसन कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य भगत पुढे म्हणाले, नेहमीच्या जीवनातून बाहेर पडल्याशिवाय माणसाला स्वतःची किंमत कळत नाही. आपली जन्मभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहे, हे जरी सत्य असले तरी जगाची सफर केल्याशिवाय ते कळत नाही. देसाई यांच्या ’जगाच्या खिडकीतून’ या पुस्तकाचे यापूर्वी प्रकाशन झाले. त्या पुस्तकाची दुबईत विक्री झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाला. ’माझी भ्रमंती’ या पुस्तकालाही असेच यश मिळेल.
यावेळी प्रा. किसन कुराडे यांनी हे पुस्तक प्राथमिक शालेय स्तरावर अभ्यासक्रमात समाविष्ठ करता येईल का? यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केले. यावेळी लेखक मुरलीधर देसाई, आविष्कार फौंडेशनचे संजय पवार, शाम कुरळे, सागर चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांता कांबळे यांचा सौ. इंदिरा देसाई यांच्या हस्ते आदर्श माता, दातृत्व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच सौ. सरिता सासने, सागर चौगले, रतन गुरव आदींचा सत्कार करण्यात आला. आभार डॉ. इंद्रजित देसाई यांनी मानले. तर विजय जाधव यांनी सूत्रसंचलन केले.